रुग्णालयात कफ सिरफही मिळत नाही : आरोग्याची “ऐशी की तैशी’
पाबळ – पाबळसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात साथीचे रोगांना भर आला असतानाही तब्बल तीन शासकीय रुग्णालय असूनही एकाही रुग्णालयात साधे कफ सिरप मिळत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक असा प्रवास केल्यानंतर रुग्णसेवा मोफत करण्याच्या प्रयत्नात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाबळ परिसरात सध्या सर्दी, खोकला, कफ या रोगाचे रुग्ण वाढलेले आहेत. केंदूर येथे आरोग्य उपकेंद्रात व प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर औषधे देतात. परंतु कप सिरप उपलब्ध नाही. याबाबतीत ग्रामीण रुग्णालयाकडे जा, असा सल्ला दिला जात असला तरी तिथे सध्या नऊ ते बारा या वेळेत ओपीडी चालू असते. त्यामुळे रुग्णांना कप सिरप मिळत नाही. ही आरोग्याची शोकांतिका आहे.
खासगी रुग्णालयात किमान 300 ते 500 रुपये एकावेळी रुग्णाला खर्च येत असल्याने गोरगरीब हवालदिल झाले आहेत. ही वस्तुस्थिती असताना हा साथीच्या रोगाचा कालावधी असल्याने या तीनही आरोग्य केंद्रांचा मेळ बसवणे गरजेचे झाले आहे.
याबाबत केंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला असता आरोग्य अधिकारी सारिका तायवडे यांनी याला दुजोरा दिला. जिल्हा उप आरोग्य अधिकारी डॉ. वाघ यांच्याशी संपर्क केला असता आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून दोन दिवसांत औषधांची सोय करण्यात येईल, अशी माहिती दिली. मात्र, तातडीने चक्रे फिरली. आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांनी उद्याच सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येईल. यापुढे औषधे कमी पडून दिली जाणार नाही, अशी माहिती स्वतः फोन करून दिली.
ग्रामीण भागातील साथीच्या रोगाविषयी सर्व्हे सुद्धा केला जाईल, अशी माहिती दिली. ग्रामीण रुग्णालयाची माहिती घेतली असता तिथेही मर्यादित औषधांचा पुरवठा होत आहे. 9 ते 12 अशी ओपीडी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, साथ रोगाच्या कालावधीत रुग्णालयात ओपीडीची वेळ वाढवण्याची मागणी होत आहे. याबाबतीत ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकपदी नव्याने नियुक्त झालेले डॉ. सचिन धस यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत वेळ वाढविण्याबाबत व अधिक औषधे उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.