पिके वाचवता वाचवता शेतकरी आलाय मेटाकुटीला
मंचर – आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दूषित वातावरणामुळे पिकांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र वातावरणात बदल होता असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी राजाचे पावसाळ्यात हातातोंडाशी आलेले उभे पीक डोळ्यांसमोर वाहून गेले. मोठ्या प्रमाणावर पिकांची नासधूस झाली. त्यातून कसेबसे उरलेले पीक वाचवता वाचवता जीव मेटाकुटीला आला.
हवालदील झालेला बळीराजा पुन्हा मातीत घाम गाळण्यासाठी सज्ज झाला. पावसाळा संपला हिवाळा चालू झाला आणि हंगामी रब्बी पीक घेण्यास बळीराजाने सुरुवात केली; परंतु अस्मानी संकाटांनी पाठ सोडली नाही. मध्येच ढगाळ वातावरण तर मध्येच रिमझिम पाऊस, सकाळ, संध्याकाळ धुक्यांची चादर अशा एकापाठोपाठ असमांनी संकाटांच्या भडिमाराने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले गेले.
हवामानातील या दररोजच्या बदलामुळे शेतातील भाजीपाला तसेच फळभाज्यांवर परिणाम होत आहे. ढगाळ हवामान, थोडाफार पाऊस, सकाळ-संध्याकाळ धुके असा हवामानात बदल होत आहे. या वातावरणामुळे शेतातील पालेभाज्या व फळभाज्या यांवर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतातील वेलवर्गीय फळभाज्यांना या बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. वेलाला आलेली फुले व फळे गळून पडत आहेत, तसेच फळांना देखील किडीचा प्रादुर्भाव होत आहे.
यामध्ये पावटा, मेथी, गहू, हरभरा, वांगी या पिकांवर पांढऱ्या रंगाच्या किड्यांच्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. लहान मुले, वयस्कर नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, हातपाय गळणे यांसारख्या आजारांनी ग्रासले आहे. औषध उपचार घेऊन देखील आजार बरे होत नाहीत. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा शेतीसह ारोग्यावर परिणाम झाला आहे.