वाळूतस्करी,गुटखा,बिबट्या,मांगूर माशाची चर्चा
नगर – राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी सर्वांगीण आराखडा लवकरच तयार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
याशिवाय, आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. बबनराव पाचपुते, आ. संग्राम जगताप, आ.आशुतोष काळे, आ. लहू कानडे यांची बैठकीस उपस्थिती होती. यावेळी विविध लोकप्रतिनिधींनी शहरातील रस्ते, पर्यटन विकास, पाणीपुरवठा योजना, ग्रामीण भागातील बिबट्यांच्या वाढता वावर, मांगूर मासा, गौण खनिज, गावठाण विस्तारीकरण, सौरऊर्जा प्रकल्प,जिल्ह्यातील वाळूतस्करी, अवैध गुटखा विक्री, क्रिडागंणांचा प्रलंबित प्रश्न, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, रस्त्यांची दुरवस्था आदींबाबत मुद्दे मांडले.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागात बिबट्यांचा वाढता वावर आणि त्यांचे लोकवस्तीत येणे यावर प्रतिबंधासाठी उपाययोजना वन विभागाने कराव्यात. त्यासाठी अधिकचे पिंजरे घेण्यात यावेत. शाळा खोल्यांच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्हा नियोजनचा निधी, आमदार व खासदार निधी आणि श्री साईबाबा विश्वस्त संस्थानने दिलेला निधी यातून उत्तमप्रकारे हे काम होऊ शकेल, असे त्यांनी नमूद केले.
वाढत्या वाळूचोरी तसेच अवैध गुटखा प्रकरणी कडक कार्यवाहीचे निर्देश त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. नगर शहर सुंदर करण्याच्या दृष्टीने शहरात जागा उपलब्ध असेल तेथे वृक्षलागवड करण्याच्या तसेच शहर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील जे प्रश्न राज्य स्तरावरील आहेत, त्यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना घेऊन मुंबईत संबंधित मंत्रीमहोदयांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.