कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांची मागणी
वाघळवाडी (वार्ताहर) – साखर कामगारांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, त्रिस्तरीय समितीची नेमणूक, कामगारांचे थकीत पगार, रोजंदारी कामगारांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केली.
सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे पार पडलेल्या पुणे जिल्हा साखर कामगार मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसरचिटणीस शंकरराव भोसले होते. यावेळी कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, युवराज रणवरे, नितीन बनकर, डी. बी. मोहिते, राजेंद्र तावरे, अशोक बिराजदार, सयाजी कदम, प्रदीप शिंदे, कैलास आवाळे, बाळासाहेब काकडे, पुरुषोत्तम परकाळे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष, सचिव आणि साखर कामगार उपस्थित होते.
सरचिटणीस शंकरराव भोसले म्हणाले, सध्या राज्यातील साखर कामगारांची दयनिय अवस्था झाली असून, पगारवाढीचा करार संपला आहे. साखर आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चात आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. राज्यातील साखर कामगारांचे अजूनही 450 ते 500 कोटी रुपये कारखानदारांकडे थकले आहेत आणि सरकार या गोष्टींकडे लक्ष देत नाही. ऊस उत्पादकांनी ज्या प्रकारे एफआरपी देण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध केला जातो, त्याप्रकारे साखर कामगारांचे पगार देण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यात यावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत गेल्याची टीका त्यांनी केली. सूत्रसंचालन कैलास जगताप यांनी केले तर बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.
साखर कामगारांचे आंदोलन तीव्र करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून मेळावे घेतले जात आहेत. याबाबत त्रिस्तरीय समितीची नेमणूक 15 डिसेंबरच्या आत झाली नाही तर साखर कामगारांच्या वतीने उग्र आंदोलन केले जाईल.
-भाऊराव पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष