बीजिंग: भारताच्या सीमेवरील सर्वसाधारण स्थिती आता स्थीर आणि पूर्ण नियंत्रणात आहे असे चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या कोणत्याही प्रसंगाविषयी चर्चा आणि सल्लामसलतीच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठीचे सारे मार्ग खुले आहेत असेही चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यावर प्रतिक्रिया देताना चीनकडून ही माहिती देण्यात आली आहे.
आज पत्रकारांशी बोलताना चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीयन यांनी सांगितले की, चीनची सीमाविषयक भूमिका स्पष्ट असून त्यातील सातत्य कायम आहे. दोन्ही देशांमध्ये जे करार किंवा समझौते झाले आहेत त्यावर आम्ही ठाम आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांची लष्करे आपसात विश्वासाचे वातावरण कायम राहील यासाठी प्रयत्नशील आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी निर्धारपूर्वक तयारी करा आणि अत्यंत भीषण परिस्थितीलाही तोंड द्यावे लागेल, असे समजून त्यादृष्टीने तयारी करा, अशी सूचना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला दिली होती. त्यामुळे दोन देशांतील तणावाच्या वातावरणात भरच पडली होती. त्या पार्श्वभूमीवर चीनकडून आज करण्यात आलेल्या वक्तव्याला महत्त्व आहे. भारत चीन सीमेवरील स्थिती आता पूर्ण नियंत्रणाखाली आहे असे चीनकडूनच सांगण्यात आल्याने हा तणाव निवळण्यास मदतच होणार आहे. भारत आणि चीन यांच्या दरम्यान 3500 किमीची सीमा रेषा आहे.