जळोची -राज्यात महापुरुषांबद्दल वाचाळवीर काहीही बोलत आहेत. बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप- शिंदे गटातील मंत्री, आमदार, खासदारांवर निशाणा साधला. गुनवडी (ता. बारामती) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल अवमानजनक बोलले जात आहे. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. माणूस एकदा चुकला तर समजू शकतो. परंतु सतत चुकीचे बोलले जात आहे. राज्यपाल चुकले की एक मंत्री चुकतोय, लगेच दुसरा मंत्री चुकतोय, ते झाले की आमदार चुकतोय, खासदार चुकतोय, असे कसे चुकून चालेल.
पवार म्हणाले की, महागाई, बेरोजगारीचा प्रश्न आहे. कोट्यवधींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या, कारखाने दुसऱ्या राज्यात जात आहेत. त्यावर कोणी बोलायला आणि उत्तर द्यायला तयार नाही. त्यासंबंधी विचारले तर बघू, करू अशी उत्तरे दिली जातात. हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कदापि झालेले नव्हते.
आत्ता मात्र सत्तेला आसुसलेली ही माणसे कुठल्याही थराला जायला मागे पुढे पाहत नाहीत. ज्या काही गोष्टी घडत आहेत, त्या महाराष्ट्रासह देशाच्या लोकशाहीला घातक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले. त्यालाही बाधा आणणारे आहे. काहीजण तर संविधान अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.