भाष्य (प्रसाद खेकाळे) : शहरात सध्या “जी-20′ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाची धूम सुरू आहे. या परिषदेसाठी पुण्याचे नाव घेतले जात असले, तरी शहराच्या ठराविक भागांतच या परिषदेचा बोलबाला सुरू आहे. तर, इतक्या झपाटलेल्या वेगाने ही “रंगीत’ विकासकामे सुरू आहेत, की पुणेकरांना अचंबा वाटत आहे. पण, या सर्व विकासात्मक बाबींमध्ये रंगरंगोटीच अधिक आहे.
मागच्या काही वर्षांत “टी-20′ हा झटपट क्रिकेटचा प्रकार लोकप्रिय झाला. यामुळे क्रिकेटच्या मुलभूत सिद्धांतांना आणि नियमांना हरताळ फासण्यात आला. उलट आक्रमक आणि वेगवान खेळ आणि झटक्यात निकाल अशा पद्धतीचा क्रिकेटचा फॉर्म्युला उदयास आला. अगदी तसाच प्रकार आता पुण्याच्या बाबतीत होताना दिसत आहे. वर्षानुवर्षे सुस्त असलेले प्रशासन अखेरच्या काही दिवसांत “जी-20′ परिषदेच्या निमित्ताने कामाला लागले. भिंती, रस्ते, पादचारी मार्ग, रस्ते दुभाजक, उड्डाणपुलांचे आणि दिव्यांचे खांब, सार्वजनिक वाहने अशा सर्वच जागांवर प्रशासनाने गेल्या पंधरवड्यापासून रंगकामे सुरू केली आहेत. विशेषत: नको त्या ठिकाणीही रंगरंगोटी, तोडफोड अन् पुन्हा दुरुस्ती केल्याने पालिका प्रशासन टीकेचे धनीही ठरले आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा चंग अधिकाऱ्यांनी बांधला आहे. हे सर्व रंगकाम दिसण्यासाठी छान-छान असले, तरीही नुसत्याच रंगरंगोटीने शहराचा विकास झाला असे कसे म्हणता येईल? रस्ते दुभाजकांवर असलेली झाडे तोडून नवीन खुरटी रोपटी लावण्यात आली आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकार म्हणजे ठेकेदारांची धन आहे का, असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.
शहराच्या विकासासाठी काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी योजना आणण्यात आली. तिची सद्यस्थिती काय? काही ठराविक भागांतच योजना राबवल्याने संपूर्ण शहर स्मार्ट झाले, ही सर्व आतिशोक्तीच झाली! ही योजना तशी कामापेक्षा उपरोधिक टीकेमुळेच अधिक चर्चेत राहिली आहे. आता तसाच कित्ता जी-20 परिषदेच्या माध्यमातून गिरवला जातो आहे. “पुण्यात जी-20 परिषद’ असा प्रचार करण्यात येतो आहे, पण ठराविक भागांतच त्यासाठी कामे केली जात आहेत. तर, उपनगरांमध्ये मात्र बकालपणा कायम आहे. दुपारी उशिरापर्यंत ठिकठिकाणी साचून राहणारा कचरा, जवळपास दिवसभर वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा अशी गैरसोयींची लांबलचक यादी आहे. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून फक्त भिंती रंगवणे आणि लोकांकडून दंड वसुली करणे इतकेच काय ते जी-20 च्या निमित्ताने पुणेकरांच्या नशिबी आले आहे. शहर सुशोभीत होत असले, तरी याच शहराचे वैभव असलेल्या मुळा, मुठा नद्यांचा बकालपणा कसा झाकणार? गल्लोगल्ली तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छत कधी करणार? वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका कधी करणार? शहराचा अनिर्बंध विस्तार कसा रोखणार? सामान्य नागरिकांना स्वच्छ-सुरक्षित पाणी कधी मिळणार? अशा प्राथमिक प्रश्नांची उत्तरे शोधली असती, तर जी-20 चा आनंद द्विगुणित झाला असता. ज्या शनिवारवाड्याला लायटिंग करून शायनिंग आणली जात आहे, त्याच वास्तूच्या परिसरात कचऱ्याचे अक्षरश: ढिग साचले आहेत. पण, मूळ प्रश्न तसेच ठेऊन उच्चपदस्थ परदेशी अधिकाऱ्यांना रंगीत भिंती दाखवण्यात आपले प्रशासन आणि सरकार धन्य मानत असेल, तर यात कसले आलेय पुण्याचे भूषण?