सोरतापवाडी, {सचिन सुंबे} -नुकत्याच झालेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनेक दिग्गज प्रस्थापितांना पराभवाचा धक्का बसला. यातून या निवडणुकीतून आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे मत हवेलीतील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
तेरा वर्षे बंद असलेला थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये हवेलीतील अनेक प्रस्थापितांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे या निवडणुकीतून खरोखरच बोध घेण्यासारखे असून या निवडणुकीत अनेक ठिकाणी इतिहास घडला असून आम्ही व आमची मुले काय फक्त सतरंज्याच उचलायचे का, असे अनेक ग्रामस्थांनी सांगितले.
उरुळी कांचन, सोरतापवाडी व लोणी काळभोर गटातुन विशिष्ट आडनावांचे उमेदवार निवडून येत असल्यामुळे कित्येक वर्ष कारखान्यावर त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. परंतु यावेळेस उरुळी कांचन, लोणी काळभोर, व सोरतापवाडी गटातून इतर आडनावांचे उमेदवार निवडून आल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
तसेच दौंड तालुक्याला कारखान्याच्या संचालक मंडळात संधी मिळत नव्हती; परंतु यावेळेस दौंड तालुक्याला दोन संचालक मिळाल्यामुळे दौंड तालुक्यातील पश्चिम भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक घोषित झाली त्यावेळेस 320 उमेदवारी अर्ज आल्यामुळे सर्वांना धक्का बसला. त्यानंतर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या त्यामध्ये दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी विरोधी गटामुळे निवडणूक झाली, असे रान पेटवून दिले. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार उभे होते. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे हवेली तालुक्यात वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
केवळ घरापुरता विचार नको
अनेक दिग्गज नेत्यांनी स्वतःच्या घरापुरताच विचार करून जे काय पाहिजे ते आम्हालाच पाहिजे, या धोरणावर उमेदवारी मिळविली. यामध्ये कुणाचा मुलगा, कुणाचा पुतण्या तर स्वतः कारखान्याच्या निवडणुकीला उभे राहिले. त्यामुळे सभासदांचा रोष ओढवून घेतला व पराभवाला सामोरे जावे लागले. या धोरणामुळे चांगल्या कार्यकर्त्यांचा मात्र बळी गेला. या निवडणुकीतून अनेक बोध घेण्यासारखे असून सर्वांना व नेतेमंडळींना आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
कार्यकत्यर्त्तंलाही संधी द्या
पुढील निवडणुकीत स्वच्छ प्रतिमा असणारा, जनमानसात वावरात असल्याची हमी देणारा, पैशांची घमेंडी नसणारा तसेच सामान्यातील सामान्य माणसाची कामे करणारा उमेदवार दिला पाहिजे, असे अनेक नागरिकांनी सांगितले. कारण येथून पुढील निवडणूक ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तरुणांनी हातात घेतली आहे .
येथून पुढील निवडणूक मलाच किंवा माझ्या घरातच सर्व पाहिजे या धोरणाप्रमाणे होणार नसून कधीतरी चटया व सतरंजी उचलणार्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे, असे हवेलीतील अनेक नागरिकांनी सांगितले.