पुणे: मार्केट यार्डातील फुलबाजार तब्बल 90 दिवसांनी फुलला. पहिल्या दिवशी नेहमीच्या तुलनेत केवळ 5 टक्केच अवक झाली. खरेदीसाठी अपेक्षित गिऱ्हाईकही नाही. येत्या 4 ते 5 दिवसात बाजार सुरूळीत सुरू होईल. सम-विषक क्रमांकानुसार निम्मे आडते दररोज कार्यरत राहणार आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तु नसल्याने सर्वात आधी मार्केट यार्डातील फुल बाजार 19 मार्चपासून बंद करण्यात आला होता. त्यानंतर 10 एप्रिलपासून बंद झालेला फळ, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभाग 31 मेपासून सुरू झाला. शेतकरी आणि आडत्यांच्या मागणीनुसार फुलबाजार सुरू करण्यात आला आहे.
सकाळी 7 दुपारी 2 या वेळेत फुलबाजार सुरू राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी बाजार आवाराची पाहणी केली. त्यावेळी फुलविभाग प्रमुख प्रदीप काळे, फुलबाजार आडते आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड, अखिल फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर यांच्यासह अन्य बाजार घटक उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय घेण्यात आलेले आहेत. येथे केवळ घाऊक विक्री होणार असून, किरकोळ विक्रीला परवानगी नाही. बाधित क्षेत्रातील लोकांना प्रवेश दिला जाणार नाही.
बाजाराविषयी बी.जे.देशमुख म्हणाले, जीवनावश्यक वस्तु नसल्याने फुलांचा बाजार दीर्घकाळ बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शेतकऱ्यांना उत्पादीत केलेल्या फुलांना बाजारपेठ हवी आहे. ग्राहकांनाही फुले हवे आहेत. याचा विचार करून आडते असोसिएशनशी चर्चा करून आजपासून बाजार सुरू केला आहे.
पहिल्या दिवशी सुमारे पाच ते सहा हजार किलो फुलांची आवक झाली. हळूहळू आवकमध्ये वाढ होईल. बाजारात सामाजिक अंतर पाळले जात आहे. गर्दी होऊ दिली जात नाही. बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे थर्मलने तापमान मोजले जात असून, सॅनिटायझर केले जात आहे. खबरदरीच्या सर्व योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.