विठ्ठल वळसे पाटील
महात्मा गांधींनी “करेंगे या मरेंगे’ म्हणत “चले जाव’ चा 1942 साली अखेरचा इशारा दिला. 9 ऑगस्ट हा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला स्वातंत्र्याचा अखेरचा लढा ठरला. या लढ्याला जवळपास आठ दशके झाली आहेत. ज्यांनी भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत हौतात्म्य स्वीकारले, त्या वीरांची या दिवशी स्मरणज्योती तेजवल्या पाहिजे.
ब्रिटिश व्यापारी म्हणून आले आणि राजकर्ते बनले. भारतात एकसंधपणा नसल्याने निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा ब्रिटिशांनी घेतला. साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी हिंदुस्थानवर राज्य केले. डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्याबरोबर भारत ही हक्काची बाजारपेठ मिळवण्यासाठी ब्रिटिशांनीही उडी घेतली. यातून संघर्ष सुरू झाले आणि ब्रिटिशांनी 1757 साली बंगालवर वर्चस्व निर्माण केले. 1757 साली प्लासीची लढाई ही ब्रिटिश सत्तेची नांदी ठरली. नंतर 1764 च्या बक्सार लढाईने हिंदुस्थान पूर्ण वर्चवाखाली आला. पुढे 1818 सालच्या लढाईत मराठा साम्राज्याचे पेशव्यांकडून पुणे हस्तगत करून संपूर्ण भारतावर ब्रिटिश सत्ता पूर्णपणे प्रस्थापित झाली. पुढे संस्थाने खालसा करत सत्तेचा अंमल सुरू केला.
1857 च्या स्वातंत्र्यसमरातही ब्रिटिशांचा पाडाव होऊ शकला नाही. येथूनच खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. अनेक बंड ब्रिटिशांनी मोडून काढले. 1947 पर्यंत क्रांती व असहकाराच्या चळवळीत अनेक हुतात्मे झाले. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत अखेर “चले जाव’ या घोषणेने 9 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासात “ऑगस्ट क्रांती’ म्हणून ओळखला जातो. तो भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा काळ होता. हे आंदोलन जनतेने हातात घेतले होते. 1940 नंतर भारताला स्वातंत्र्य द्यावे, म्हणून जगभर चर्चा सुरू झाली होती.
भारतातील अनेक विद्वान आता सक्षम राज्यकारभार करण्यास तयार झाले होते. याच काळात जगात दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले होते. युद्धामुळे जागतिक शांततेचा प्रश्न निर्माण झाला होता. ब्रिटन युद्धात गुंतलेले असताना, मित्र राष्ट्रांची पीछेहाट होत होती आणि जर्मनी व जपान सर्वत्र आगेकूच करीत असताना, गांधीजींनी याच वेळी स्वातंत्र्य द्या म्हणून लढा पुकारण्याचे ठरवले होते. “भारतीय स्वातंत्र्याची मागणी मान्य करा, आम्ही युद्धात सर्व प्रकारची मदत करू’ अशी भूमिका महात्मा गांधी व कॉंग्रेसने घेतली होती. तर “आधी युद्धात मदत करा, युद्ध संपल्यावर भारताच्या स्वातंत्र्याचे ठरवू’ हे ब्रिटिश धोरण होते.
ब्रिटिश धोरणांचा आतापर्यंत अनेकदा अनुभव आल्याने महात्मा गांधी “भारत छोडो चळवळी’च्या तयारीला लागले. या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे 9 जुलै 1942 रोजी बापुकुटीतील निवासात तयार करण्यात आला आणि 14 जुलै रोजी कॉंग्रेसच्या वतीने अंतिम स्वरूप देण्यात आले. पुढे या मसुद्याला “वर्धा ठराव’ म्हणून मान्यता देण्यात आली. 7 व 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत झालेल्या कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीने मंजूर करून पास केला. 8 ऑगस्टच्या संध्याकाळी गवालिया टॅंक मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली.
देशभरातून लाखो लोक जमा झाले होते तर कॉंग्रेसचे दहा हजार प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुंबई महापौर युसुफ मेहेरअली यांनी “चले जाव’ व “भारत छोडो’ हे शब्द सुचवले व त्यावर मान्यता मिळाली. यावेळी महात्मा गांधींजींचे ठराव मंजुरीचे, लढ्याची कारणे, मीमांसा व समारोप असे सव्वादोन तासांचे भाषण झाले. त्यास रात्रीचे 10 वाजून गेले होते. हे आंदोलन आता देशभर पसरणार म्हणून 9 ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह 12 कॉंग्रेस नेत्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले. या आंदोलनाला मुस्लीम लीग, हिंदू महासभा, कम्युनिस्टांचा विरोध होता. नेत्यांच्या अटकेनंतर हे आंदोलन जनतेने हातात घेतले.
डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, युसूफ मेहरअली, डॉ. राजेंद्र प्रसाद, खान अब्दुल गफार खान, मौलाना अब्दुल कलाम आझाद, मदनमोहन मालवीय, सरोजिनी नायडू असे अनेक दिग्ग्ज मंडळी या आंदोलनात सक्रिय झाली. भारतीय जनमानसात असंतोषाचा विस्फोट झाला त्यामुळे ब्रिटिश शासन भयभीत झाले. या आंदोलनात देशभरात 9 लाख लोकांनी अटक करून घेतली होती.
9 ऑगस्ट 1947 रोजी पहाटे गवालिया टॅंक परिसरात बंदी हुकूम लावून जमावावर लाठीहल्ला, अश्रुधुरांचा मारा केला. सकाळी तिरंगा झेंडा फडकविण्याची साऱ्यांना उत्सुकता लागली होती. तेवढ्यात 22 वर्षांची एक तरुणी अरुणा असफअली त्या जमावातून धावत ध्वजस्तंभाजवळ आली. झाडावर चढावे तसे तिने त्या खांबावर झेप घेतली आणि दोरी ओढून तिरंगा फडकावला. ब्रिटिशांनी या तरुणीला खाली खेचत बेदम मारहाण केली. या कृतीने देशभर आंदोलनाचा वेग शहरातून ग्रामीण भागात गेला. एकाच वेळी देशभर कारवाया सुरू झाल्या व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक सत्र सुरू केले अनेक नेते भूमिगत झाले.
देशभर पोलीस ठाण्यावर व मामलेदार कचेरीवर, सरकारी कार्यालयांवर मोर्चे निघू लागले. हातात तिरंगा झेंडा व घोषणा देत लाठीचार्ज व गोळीबार झेलत तिरंगा फडकू लागला. समाजवाद्यांनी भूमिगत कारवायांवर लक्ष केले. रेल्वे स्थानके मोडतोड, रूळ उखडणे, पोस्ट कार्यालय जाळणे, वीज तोडणे, गनिमी पद्धतीने ही कामे सुरू झाली. पोलिसांकडून अटक सत्र सुरू झाले. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिक, स्त्री-पुरुष या आंदोलनात सहभागी झाले. देशभरातील युवकांनी यात भाग घेतला. शाळा, कॉलेजात तिरंगा फडकू लागला. विद्यार्थ्यांवरसुद्धा गोळीबार केला जाऊ लागला.
देशभर स्वातंत्र्याचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. नंदुरबारच्या छोट्या शिरीषकुमारने देशासाठी आपल्या चिमुकल्या जीवाचे बलिदान दिले. तर परदेशीमालाच्या गाडीपुढे बाबू गेणू सैद यांनी बलिदान दिले. “चले जाव’मुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना केली. सरकारकडून धरपकड व प्रचंड दडपशाहीचा वापर केला. हे आंदोलन उभे राहण्याआधीच ब्रिटिश सरकारने मोडून काढण्याचे ठरवले होते. त्या पद्धतीने देशभर कारवाया केल्या आणि आंदोलन मोडून काढले. पण या आंदोलनाने जगाला वेगळी ओळख दिली. कोणताच सेनापती नसताना स्वातंत्र्याचे युद्ध जनतेने हातात घेतले. पुढे भारत स्वातंत्र्याचा विचार केला जाऊ लागला, अखेर 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य प्राप्त झाले.
—————–