डोर्लेवाडी – संपूर्ण राज्यात गेले आठ महिने बंद असलेली धार्मिक स्थळ व मंदिरे आज शासनाच्या आदेशाने खुली करण्यात आली. अष्टविनायकातील प्रथम गणपती मोरगावचा श्री मयुरेश्वर मंदिरात भाविकांनी दीपावली पाडव्याच्या निमित्त श्रींचे दर्शन घेतले. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने धार्मिक स्थळे व मंदिर 30 मार्च पासून बंद करण्यात आली होती. अष्टविनायकातील प्रथम गणपती मोरगावच्या श्री मयूरेश्वरला मंदिर परिसरात यामुळे दर्शन बंद होती.
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी वारंवार होत असलेली मागणी लक्षात घेऊन आघाडी शासनाच्या वतीने दीपावली पाडव्याचा मुहूर्त निश्चित केला. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार देखील मानण्यात आले.