श्रीलंका निवड समितीच्या डीसिल्व्हा यांची मागणी
कोलंबो – भारत विश्वविजेता बनलेल्या 2011 साली झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना फिक्स होता, असा आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न या सामन्याने पूर्ण झाले त्या सचिनसाठी तरी या आरोपांतील तथ्य शोधले जावे यासाठी चौकशी करण्याची मागणी श्रीलंका निवड समितीचे अध्यक्ष व माजी कसोटीपटू अरविंद डीसिल्व्हा यांनी केली आहे.
हा सामना भारतीय संघाने जिंकून 1983 नंतर 28 वर्षांनी विश्वकरंडक भारतात आणला होता. सचिनने भारतीय संघात पदार्पण केल्यापासून देशाला विश्वकरंडक जिंकून देण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याचे स्वप्न त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात पूर्ण झाले, त्यामुळे खरेतर त्याची कारकीर्द आणखीनच चमकदार ठरली. मात्र, हा सामना आयसीसी, बीसीसीआय व श्रीलंका क्रिकेट मंडळ यांनी फिक्स केला होता, असा आरोप अलुथगमगे यांनी केला होता. त्यांच्या आरोपात तथ्य आहे का नाही हे निदान सचिनसाठी तरी तपासून पाहायला हवे, अन्यथा भारतीय संघाच्या विजेतेपदावर बट्टा लागेल, असे मत डीसिल्व्हा यांनी व्यक्त केले.
श्रीलंकेचे माजी कर्णधार व कसोटीपटू कुमार संगकारा व माहेला जयवर्धने यांच्यासह अनेक आजी माजी खेळाडूंनी अलुथगमगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
अलुथगमगे यांच्यासह अन्य काही लोक वारंवार असे आरोप करतात; पण पुरावा देत नाहीत मग त्यांना इतके गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, असे मत संगकाराने व्यक्त केले आहे.