– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारकाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच असून याबाबत स्थानिक नागरिक आणि अधिकारीवर्गाचा पाठपुरावा होत नसल्याने या राष्ट्रीय स्मारकाच्या फायली मंत्रालय पातळीवर लाल फितीत अडकून आहेत. ज्यांनी देश स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली त्या थोर क्रांतिकारकांच्या राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारकाचे काम अजूनही रेंगाळल्याने हे स्थानिक राजकीय नेत्यांचे अपयश आहे, असेच मानले जात आहे. मतांचे राजकारण करणारे जिल्ह्यासह तालुक्यातील नेते आतातरी जागे होतील का? असा प्रश्न गेली अनेक दिवसांपासून सतावत आहे. अधिकारी येतात-जातात पाहणी होते प्रस्ताव जातात. मात्र, लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने पुढे सर्व कामे रखडत आहेत, गेली अनेक वर्षांपासूनची अशीच स्थिती आहे.
राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारकाचे गेली कित्येक वर्षे प्रलंबित होते. त्यासाठी मोठी आंदोलने झाली. त्यानंतर सरकारची काहीशी झोप उडाली. त्यांनी तत्काळ या कामासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ खोलीचे बांधकाम व थोरला वाडा बांधण्यात आला. मात्र, या कामात सरकारच्या पुरातत्व खात्यानेच भ्रष्टाचार केला. यासाठी मोठा लढा स्थानिक नागरिकांनी दिला, आंदोलने झाली. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारने निलंबितही केले. मात्र, त्यापुढे सरकार पुन्हा झोपी गेले ते आजपर्यंत उठलेच नाही. दुसरीकडे येथील प्रांत अधिकारी आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षनामागून सर्वेक्षणे करण्यात आली. त्यानुसार आराखडे बनवले. गेल्या पाच वर्षापूर्वी शासनाकडे 85 कोटी रुपयांचा आराखडा पाठवण्यात आला तो अजूनही धूळखात पडून आहे. या स्मारकाच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे.
येथील स्मारकाचे केवळ राजकारण केले जाते तालुक्यातील जिल्हातील नेते, उच्च अधिकारी या वाड्याकडे फिरकतही नाहीत. निवडणुकीच्या काळात मागील वर्षे या वाड्यात गृहमंत्री अमित शाह आले होते, त्यांनी देखील या स्मारकासाठी सरकार सत्तेत आल्याबरोबर पाहिजे तेवढा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना देखील याचा विसर पडला आहे.
ज्या थोर हुतात्म्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्या क्रांतीकारांकांच्या पदरी मात्र उपेक्षा आली आहे. येथील जन्मस्थळ स्मारकात दरवर्षी 15 ऑगष्ट, 26 जानेवरी, 1 मे, हुतात्मा राजगुरू जयंती पुण्यतिथी निमित्ताने ध्वजारोहण होते.
मात्र, तालुक्यातील पुढारी याकडे कानाडोळा करतात. एवढेच काय तर शासकीय अधिकारी देखील फिरकत नाहीत. निवडणुकीच्या प्रचाराला मंत्री आले की, त्यामागे कोडगेपणाने त्यांच्या मागे फिरतात. पुढे मात्र त्याचा पाठपुरावा होत नाही. ज्यांना निवडून दिले ते तर वाड्याकडे फिरकत देखील नाहीत. येथील हुतात्मा स्मारक समिती, हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा वाडा आणि येथील इतिहास तग धरून आहे.