बाळासाहेब वाबळे
काऱ्हाटी – खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिल्याने हिरवा चारा, नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा डेपो, जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची गोपालकांची मागणी आहे.
खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपून गेली. काही शेतकऱ्यांनी पिके मोडून काढली. शेतकरी रब्बी हंगामाचा विचार करू लागले आहेत. मात्र, अद्यापही पाऊस नसल्याने अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे. काही भागात टॅंकर सुरू करण्याची मागणी आहे.
कन्हा नदी कोरडी ठणठणीत आहे. थोडे पाणी असलेली काही ठिकाणची पिके वगळता उसाची दयनीय अवस्था झाली आहे. पाण्याचे संकट मोठे आहे. परिसरात पावसाने दडी मारल्याने चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अनेक शेतकरी बागायत भागातून मिळेल त्या किमतीने चारा विकत घेत आहेत. चालू वर्षी पावसाने कमालीची ओढ दिल्याने ऐन पावसाळ्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांचे यंदाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दुसरीकडे जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी तर स्वतःचाच ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी तोडण्यास सुरुवात केली आहे. परिसरात अद्याप रिमझिम पाऊस वगळता मोठा एकही दमदार असा पाऊसच झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगामात लागवड केलेली पिके पाण्यावाचून जळून गेली आहेत. गणेशोत्सवापर्यंत पाऊस नाही झाला नाही तर जनावरे विकावी लागतील तर पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर चालू करावा लागेल, अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
जिरायती भागात खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर कडधान्य पिके हीच शेतकऱ्यांसाठी वर्षभराचा आधार ठरतात. कांद्याचे उत्पादन या भागात घेतले जाते. शिवाय चारा पिके केली जातात. यंदा सर्वच पिकांना पाऊस नसल्याचा मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत. शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड तर बसला आहे. याशिवाय आता वर्षभर चाऱ्यासह धान्य विकत घेऊन खाण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
कवडीमोल भावाने… काहाटी, माळवाडी, फोंडवाडा, भिलारवाडी, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, देऊळगाव रसाळ आदी भागात यावर्षी पाऊसच झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केलेली पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. भविष्यात रब्बी हंगामाला देखील पाऊस पडतो की नाही, या आशेवर शेतकरी बसला अशीच ओढ दिली तर जीवापाड सांभाळ केलेली जनावरे विकावी लागण्याची वेळ गोपालकांवर येणार आहे.