नवी दिल्ली : राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी “भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे”, असे म्हटले आहे. छत्तीसगडमधील सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूरमध्ये आयोजित स्वयंसेवकांच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे. कोणालाही पूजा करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, कारण सर्व प्रार्थना एकाच ठिकाणी जातात, असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.
मोहन भागवत यांनी, “प्राचीन काळापासून विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणे, हा हिंदूत्वाचा विचार आहे”, असेही भागवत यांनी म्हटले आहे. “भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, हे आम्ही १९२५ पासून म्हणत आहोत. जो व्यक्ती भारताला आपली आई, मातृभूमी मानतो, जो व्यक्ती भारतातील विविधतेतील एकता या संस्कृतीत जगायला तयार आहे, मग त्या व्यक्तीची भाषा, आहार आणि प्रथा-परंपरा कुठलीही असो, तो हिंदू आहे”, असे म्हटले आहे.
“देशातील प्रत्येकाचा डीएनए आणि पूर्वज एक आहे”, असे भागवत यांनी म्हटले आहे. “भारतात विविधता असूनही आपण सर्व एकसमान आहोत. प्रत्येक भारतीय ४० हजार वर्ष जुन्या अखंड भारताचा भाग आहे. प्रत्येकाने आपली श्रद्धा आणि पूजा करण्याची पद्धत जोपासली पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्यातील या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करू नये, अशी शिकवण आपल्या पूर्वजांची आहे”, असे प्रतिपादन भागवत यांनी केले आहे.
“आपली संस्कृती सर्वांना जोडणारी आहे. आपण अंतर्गत कितीही भांडलो तरीही संकटाच्या वेळी एकत्र येतो. देशावर आलेल्या करोना संकटांचा आपण एकजुटीनं सामना केला” असेही भागवत यावेळी म्हणाले.