पुणे – वाहतूक कोंडीत पीएमपी बस अडकली की चालक आणि प्रवासी यांना मनस्ताप सहन करावा लागतो. विशेषत: लांब पल्ल्याच्या बसमध्ये हा अनुभव येतो. मात्र, यापुढे प्रवाशांचा हा मनस्ताप कमी होणार असून कोंडी असलेल्या भागात बस न जाता, ती अलीकडेच प्रवाशांना सोडणार आणि तेथून पुढे दुसऱ्या बसने प्रवाशांना इच्छितस्थळी जाता येणार आहे. त्यामध्ये वेळ आणि मनस्ताप दोन्ही कमी होणार असून, त्यानुसार शहरातील कोंडीचे रस्ते, चौक याची पाहणी करून लांब पल्ल्याच्या बस कशा वळविता येतील याची पाहणी सुरू आहे.
शहरातील वाहतूक कोंडीतून पीएमपी बस नेताना चालकाचा घाम निघतो तर प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्याचा, परिणाम बस संचलनावर होतो. त्यात सण-सुद, उत्सव, मिरवणूक यामध्ये तासन्तास बस कोंडीत अडकते आणि बसच्या पुढील फेऱ्या रद्द होतात. परिणामी, प्रवाशांना सेवा मिळण्यास विलंब होतो.
लांब पल्ल्याच्या बस कोंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी अडकतात, त्यामुळे तासभर बसमध्येच बसून रहावे लागते. हा मनस्ताप कमी करण्यासाठी, प्रवाशांना तत्काळ सेवा उपलब्ध व्हावी आणि संचलनही सुस्थितीत चालावे यासाठी व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांच्या सुचनेनुसार प्रायोगिक तत्त्वावर हा बदल करण्याचे नियोजन सुरू आहे.
कसा असेल हा प्रयोग…
शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर नेहमीच कोंडी असते. त्यात सणासुदीला अधिकच कोंडी होते, अशावेळी निगडीवरून स्वारगेट किंवा कात्रजला बस जात असेल तर संचेती चौक किंवा शनिवार वाडापर्यंत बस येणार, प्रवाशांना सोडणार आणि पुन्हा निगडीच्या दिशेने धावणार. शनिवारवाडा येथून स्वारगेट आणि कात्रजला जाणाऱ्या बसमध्ये हे प्रवासी बसून पुढचा प्रवास करतील.