पवन मावळ (नीलेश ठाकर ) – “व्हॅलेंटाइन डे’ करिता परदेशात मोठ्या प्रमाणावर डच गुलाब निर्यात करण्यासाठी मावळ तालुका आघाडीवर आहे. आता डच गुलाबांबरोबरच निर्यातक्षम गुलाबरोपेदेखील पाठविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. त्याकरिता पवना फुल उत्पादक संघाच्या माध्यमातून पवनानगर परिसरातील येळसे (ता. मावळ) येथे वतीने पाच एकर क्षेत्रात अत्याधुनिक रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. वर्षभरात 50 ते 55 लाख निर्यातक्षम गुलाबरोपे तयार केली जाणार आहेत. या माध्यमातून मावळ तालुक्यातील फुल उत्पादक संघ व शेतकऱ्यांना रोपे दजेरदार रोपे पुरवून परदेशात ही रोपे निर्यात करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
मावळ तालुका हा देशातील सर्वात जास्त गुलाब फुलांचे उत्पादन घेणारा तालुका आहे. परंतु त्यासाठी लागणारी रोपे (वाण) हे परराज्यातून आणावी लागत होती. यामध्ये अनेक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत होता. जसे की दर्जेदार रोपे न मिळणे, वेळेत न मिळणे, अनेकवेळा आर्थिक व्यवहारातून देखील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्हायची, पिळवणूक व्हायची, त्यामुळे मावळ तालुक्यातच अत्याधुनिक रोपवाटिका सुरु करण्याचा निर्णय पवना फुल उत्पादक संघाने घेतला. सुरुवातील 10 गुंठ्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही रोपवाटिका सुरू करण्यात आली. त्यानंतर त्यात अभ्यास करून हळूहळू जम बसवला.
रोपाच्या दर्जावर सर्वात मोठे काम केले. त्यामुळे बाजरात नाव टिकून राहिले आणि त्याचेच फलित म्हणून गेल्या तीन वर्षात या व्यवसायाचे वटवृक्षात रूपांतर होऊन आता हे क्षेत्र पाच एकरवर गेले आहे. त्यामुळे वर्षभरात साधारण 50 ते 55 लाख रोपे तयार होतील, अशा क्षमतेची सुसज्ज स्वयंचलित नर्सरी अत्याधुनिक शेती पद्धतीत तालुक्याचे नावलौकिक करत आहे. याच नर्सरीद्वारे मावळातील सर्व शेतकऱ्यांची गरज भागवून राज्य व देशभरात झाडे निर्यात केली जातात. विविध प्रयोगांतून काळजीपूर्वक झाडाची गुणवत्ता जपल्यामुळे परदेशातून देखील मोठ्या प्रमाणात येथील झाडांना मागणी आहे. पूर्वी परराज्यातून झाडे घेताना फसवणूक होऊन हताश झालेले शेतकरी आता मावळ तालुक्यातच झाडे उपलब्ध होत असल्याने आता समाधानी दिसत आहेत.
14 रंगांच्या गुलाबांचे उत्पादन
“साई रोझेस नर्सरी’ या अत्याधुनिक व स्वयंचलित नर्सरीमध्ये सद्यस्थितीला 14 प्रकारची (रंगांच्या) रोपे तयार केली जातात. यामुळे जवळजवळ 60 लोकांना रोजगार उपलब्ध झाला. सुरुवातीपासूनच चांगल्या दर्जाची रोपे तयार करून त्याची विक्री केल्याने शेतकऱ्यांची मने जिंकता आली. यामधूनच व्यवसायात आर्थिक भरभराट आली. यावर्षी दोन एकर क्षेत्र वाढविल्याने आणखी काही रंगांच्या (जातीच्या) रोपांचे उत्पादन घेता येईल.
– मुकुंद ठाकर, उद्योजक, साई रोझेस नर्सरी.