कराड – कराड नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात सुरू केलेली शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरु होती. शुक्रवारी पालिकेने अतिक्रमणविरोधी पथकाच्या दोन टीम तयार केल्या. यामध्ये कृष्णा नाका ते चावडी चौकपर्यंतच्या टप्प्यातील शेकडो अवैध बांधकामे आणि टपऱ्या हटवल्या. तर दुसऱ्या टीमने मंडई परिसरातील शेकडो अवैध बांधकामावर हातोडा चालविला.
यावेळी काही नागरिकांनी अतिक्रमणविरोधी पथकाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु ही मोहीम पोलीस बंदोबस्तात सुरु असल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणालाही न जुमानता नोंद नसणाऱ्या बांधकामांवर जेसीबी चालवून ती उद्धवस्त केली.
शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांसह व्यावसायिक, दुकानदार, हातगाडे, चायनिज गाडेवाल्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. याबाबत स्वत: जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांनीही नाराजी व्यक्त केली होती. शहरात वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम अतिक्रमणे हटवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली होती.
त्यानुसार मुख्याधिकारी यशवंत डांगे, अभियंता ए. आर. पवार, आर. डी. भालदार आदींनी शहरातील अतिक्रमणाचा सर्वे करून आराखडा तयार केला. शहरातील अतिक्रमण धारकांसह हातगाडा धारकांनाही या मोहिमेची नोटीसीव्दारे आणि दवंडी देवून माहिती दिली होती. त्यानुसार बुधवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
बुधवारी दत्त चौक ते विजय दिवस चौक, रेव्हिन्यू क्लब ते भेदा चौक आणि तेथून पोपटभाई पेट्रोलपंप या मार्गावरील सुमारे 450 अतिक्रमणे हटवली होती. गुरूवारी दुसऱ्या दिवशी नियोजनानुसार पोपटभाई पेट्रोलपंप ते कोल्हापूर नाका डावी बाजू आणि कोल्हापूर नाक्यापासून शहर पोलीस ठाणे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा ते दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत आणि विजय दिवस चौक ते कॉटेज हॉस्पिटल ते कृष्णा नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असणारी पार्किंग शेड, पत्रा शेड, दुकानाबाहेरील पत्रा, दुकानाचे लाईटींग बोर्ड, काही रस्त्यावर लावलेल्या गाड्या, फलक, हॉटेलबाहेरील बांधीव कट्टे आदी प्रकारची सुमारे 200 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.
तिसऱ्या दिवशी नगरपालिकेने अतिक्रमणविरोधी पथकाच्या दोन टीम तयार केल्या. यामध्ये कृष्णा नाक्यापासून सुरूवात करून मंगळवार पेठ येथील बेकायदेशीर रेस्टॉरंट, चायनीज स्टॉल, चहाचे गाडे, गॅरेज, पानटपऱ्या, झोपड्या, लहानमोठी दुकाने, जाहिरातींचे बेकायदेशीर फलक, फ्लेक्स, पत्र्याशी शेड यांच्यावर जेसीबी चालवून ती उद्धवस्त करण्यात आली. त्यानंतर मंगळवार पेठेतून पुढे चावडी चौकमार्गे ही कारवाई सुरूच होती.
चावडी चौक येथील पोलीस विभागाची चौकीही यामध्ये उद्धवस्त करण्यात आली. त्यानंतर चावडी चौक मार्गे पेठलाईनने पुढे दत्त चौक मार्गे ही कारवाई केली. तर दुसरी टीम मंडई परिसरात पाचारण केल्यामुळे शुक्रवारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटवण्यात आली. सुमारे 300 अतिक्रमण हटवण्यात आली. त्यामुळे तीन दिवसाच्या मोहिमेत हजारच्या आसपास अतिक्रमणावर पालिकेने हातोडा मारला आहे. या मोहिमेचे सर्वस्तरातून जोरदार स्वागत होत आहे.
या मोहिमेमुळे शहरातील परिसर कधी नव्हे ते मोकळा श्वास घेताना दिसत आहे. पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगर अभियंता ए. आर. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत नगरपालिका आणि पोलीस विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. तीन जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अतिक्रमणातील साहित्य हटविण्यात येत होते.