Thackeray group – देशातील पाच राज्यातील निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपकडून करण्यात आलेल्या प्रचारादरम्यान मत मिळविण्यासाठी विविध प्रलोभणे दाखविण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने (Thackeray group) केला आहे.
तर यावर निवडणूक आयोग काहीच कसे बोलत नाही म्हणत निवडणूक आयोग आता पिंजऱ्यातला पोपट झाला आहे, असा थेट हल्ला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ठाकरे गटाच्या मुखपत्रातील “रोखठोक’ सदरातून केला आहे.
राज्यातील पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे देशातील लोकसभेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जाते. या पाच राज्यात भाजप सत्ता मिळविण्यासाठी ताकदीने उतरल्याचे पाहायला मिळाले.
असे असतानाच याच निवडणुकींच्या प्रचारादरम्यान भाजपकडून करण्यात आलेल्या विविध घोषणांचा ठाकरे गटाकडून समाचार घेण्यात आला आहे. भारताचा सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे एक भंपकपणाचे प्रतीक बनला आहे.
या देशाला एक निवडणूक आयोग आहे व मनात आणले तर तो स्वतंत्रपणे कर्तव्य बजावू शकतो, हे टी. एन. शेषन यांच्या कार्यकाळात दिसून आले. निवडणूक आयोगाच्या डरकाळीची तेव्हा गरज नव्हती, तर वाघाने शेपटी हलवली तरी सर्वच राजकीय पक्षांचा थरकाप होत असे.
त्याच निवडणूक आयोगाचा आता पिंजऱ्यातला पोपट झाला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने ते सिद्ध झाले आहे असा थेट हल्ला त्यांनी केला आहे. भाजपच्या पायाखालची वाळू या निवडणुकीत सरकली आहे.
नरेंद्र मोदी, अमित शहांपासून सर्वच भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत. त्यामुळे धार्मिक प्रचार करून बुडती नौका वाचवणे हेच त्यांचे धोरण बनले आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.