World Cup 2023 Final India vs Australia Live Score Updates in Marathi : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ऑस्ट्रेलियनं गोलंदाजांनी अगदी योग्य ठरवला. टीम इंडियानं या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 240 धावांच्या आधीच रोखलं.
संपूर्ण स्पर्धेत स्फोटक फलंदाजी करणारा भारतीय संघ अंतिम फेरीत अपयशी ठरला . अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, मधल्या षटकांमध्ये भारतीय डाव रुळावरून घसरला. याचे परिणाम टीम इंडियाला भोगावे लागले आहेत.
याआधीच्या सामन्यांमध्ये भारताच्या मधल्या फळीने सुरुवातीलाच विकेट पडल्यावर डावाची धुरा सांभाळली होती, पण या सामन्यात तसे होऊ शकले नाही. भारतीय मधल्या फळीने डावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु नियमित अंतराने विकेट पडण्यापासून ते रोखू शकले नाहीत. याशिवाय एका सामन्यात पार्ट टाइम गोलंदाज किती प्रभाव पाडू शकतात हेही ऑस्ट्रेलियाने दाखवून दिले. या सामन्यात भारतीय फलंदाजांना एकूण 13 चौकार आणि तीन षटकार मारता आले.
भारतीय डाव कसा कोसळला?
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कमिन्सनं खेळपट्टीचा चांगला अंदाज घेतला आणि त्याने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. याचा फायदा घेत त्याने भारतीय फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. रोहित शर्माने सुरुवातीला काही आक्रमक फटके मारून भारताला नक्कीच वेगवान सुरुवात करून दिली, पण पाचव्या षटकात चुकीचा फटका खेळून शुभमन गिल बाद झाल्यानंतर तोही दडपणाखाली आला.
रोहित दुसऱ्या टोकाकडून मोठे फटके खेळत असताना त्याला स्ट्राईक देण्याऐवजी शुभमनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि मिडऑनला तो झेलबाद झाला. शुभमन अवघ्या सात चेंडूत चार धावा करून बाद झाला. यानंतर मोठ्या फटकेबाजीमुळे रोहितनेही आपली विकेट गमावली. त्याने 31 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि तीन षटकार मारले. भारताने 76 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या.
श्रेयसची बेफिकीर फलंदाजी…
अशा स्थितीत मैदानात आलेल्या श्रेयस अय्यर आणि विराट कोहली या दोन नवीन फलंदाजांचे काम डाव सांभाळणे आणि स्ट्राईक रोटेट करणे हे होते, परंतु कमिन्सने श्रेयसला लेन्थ बॉलवर यष्टिरक्षकाकडून झेलबाद केले. गेल्या दोन सामन्यात शतके झळकावणारा श्रेयस चार धावा करून स्वस्तात बाद झाला. टीम इंडियाने 81 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर विराटने केएल राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली.
असे वाटत होते की हे दोन्ही फलंदाज स्थिरावू लागले आहेत आणि आता धावगती वाढवतील. त्यानंतर कमिन्सने विराटला बोल्ड केले. तो 63 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला. यानंतर तळातील फलंदाज येऊ लागले. राहुलने अर्धशतक नक्कीच केले, पण धावगती वाढवण्याची वेळ येताच त्याने आपली विकेट फेकून दिली आणि निघून गेला. त्याला स्टार्कने यष्टिरक्षक इंग्लिशच्या हाती झेलबाद केले.
तळातील फलंदाजांनी केले निराश; सूर्याने स्वतः स्ट्राइक घेण्यापेक्षा….
रवींद्र जडेजा (9) हेझलवूडने, मोहम्मद शमी (6) आणि जसप्रीत बुमराह (1) झम्पाने LBW आऊट केले. सूर्यकुमार यादवकडून काही धावा अपेक्षित होत्या. तो टेल-एंडर्ससह फलंदाजीला आला, परंतु सूर्याने स्वतः स्ट्राइक घेण्यापेक्षा टेल-एंडर्सना स्ट्राइक देण्यावर अधिक विश्वास ठेवला. अनेक प्रसंगी तो षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिंगल घेताना दिसला आणि पुढच्या षटकात शमी-कुलदीप पुन्हा स्ट्राइक घेताना दिसले. शेवटी सूर्या (18)ही विकेट फेकून पॅव्हेलियनमध्ये परतला. या विश्वचषकात भारतीय संघ प्रथमच ऑलआऊट झाला.
जिथे भारताने पहिल्या 10 षटकात दोन गडी गमावून 80 धावा केल्या होत्या. या काळात त्यांनी नऊ चौकार आणि तीन षटकार मारले होते. त्याचवेळी 11 ते 40 षटकांत भारताने तीन विकेट गमावून 117 धावा केल्या. या काळात त्याचा स्कोअरिंग रेट 3.9 होता. भारताने 11 ते 40 षटकांत म्हणजे 30 षटकांत फक्त दोन चौकार मारले. विश्वचषक 2023 मध्ये 11 ते 40 षटकांदरम्यान कोणत्याही संघाने मारलेल्या चौकारांची ही सर्वात कमी संख्या आहे. या 30 षटकांमध्ये भारताला या विश्वचषकात प्रथमच एकही षटकार मारण्यात यश आले नाही. 11 ते 40 षटकांमध्ये सर्वात महागडं षटक हे 39 वे होते, या षटकात 10 धावा आल्या.
पार्ट-टाइमरची गोलंदाजीही सामन्याचा टर्निंग पॉइंट…
या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी तीन पार्टटाइमरने गोलंदाजी केली. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांचा समावेश आहे. त्याने 10 षटकात 44 धावा दिल्या आणि रोहित शर्माची विकेट घेण्यात ते यशस्वी ठरले. त्याला मॅक्सवेलने झेलबाद केले. ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने दाखवून दिले की संघात अतिरिक्त गोलंदाज असणे किती फायदेशीर आहे. तीन पार्ट-टाइमरची किफायतशीर गोलंदाजीही सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. अशा स्थितीत टीम इंडियाला सहाव्या गोलंदाजाची उणीव भासू शकते. या सामन्यात हार्दिक पांड्याला मुकले. अतिरिक्त फलंदाजी पर्याय असण्यासोबतच तो गोलंदाजीचा पर्यायही देतो.
टॉस राहिलं कारण? कांगारूंचे जबरदस्त क्षेत्ररक्षण….
नाणेफेक हे भारताच्या खराब फलंदाजीचे कारण मानले जात नाही. नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी केली असती, असे रोहित टॉसदरम्यान म्हणाला होता. अशा परिस्थितीत भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. खेळपट्टी निश्चितच संथ होती आणि चेंडू बॅटवर नीट येत नव्हता. याशिवाय अंतिम सामन्याचे दडपणही सांगता येईल. डेथ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अतिशय संथ (कमी वेगानं) चेंडूं टाकले.
याशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातही जास्त मेहनत घेतली. कांगारू खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातून अनेक चौकार वाचवले आणि धावा मोजल्या तर जवळपास 60-70 धावा वाचवल्या असतील. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सीमारेषेवर जबरदस्त क्षेत्ररक्षण करत अनेक चौकार रोखले. जवळपास 20 ऑस्ट्रेलियन खेळाडू क्षेत्ररक्षण करत आहेत असे वाटत होते.