नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचे सध्या रोज 35 हजार कोटी रुपयाचे होत आहे. 21 दिवस केलेल्या लॉक डाऊन मुळे अर्थव्यवस्थेचे 8 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने लॉक डाऊन कालावधीमध्ये आणखी वाढ केली आहे.
25 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलल्या लॉक डाऊन मध्ये 70% कामकाज बंद झाले आहे. त्यामध्ये आर्थिक घडामोडी, गुंतवणूक, निर्यात इत्यादीचा समावेश होता. फक्त कृषी, खाण, बॅंकिंग सेवा आणि काही प्रमाणात माहिती-तंत्रज्ञान सेवाचे काम सध्या चालू आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बेकारी आणि दारिद्रय निर्मूलनासाठी विकासदर वाढविण्याची आवश्यकता असतानाच करोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे विकास दर आता 1 टक्क्यापर्यंत घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जगातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भारतातील लॉकडाऊनमध्ये उद्योग-व्यवसाय तर बंद आहेच त्याचबरोबर विमानसेवा आणि रेल्वे सेवा बंद आहे. विमानाने व रेल्वेमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. सेंक्टम संशोधन संस्थेने केलेल्या मूल्यांकनानुसार 21 दिवसांमध्ये किमान 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे आगामी काळात भारतीय जनतेला आणि सरकारला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नेटाने काम करावे लागणार असल्याचे या संशोधन अहवालात सुचविण्यात आले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे आणखी तेवढाच काळ लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 एप्रिल रोजी एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन काही क्षेत्रांना थोड्याफार प्रमाणात सूट देण्याचे संकेत दिले आहेत.
लॉकडाऊनमुळे वाहतूक, हॉटेल, रिअल इस्टेट क्षेत्रात काम ठप्प झाले आहे. देशातील लाखो ट्रक रस्त्यावर थांबले आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे रोज 2 हजार दोनशे कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कॉंग्रेसचे महासंचालक नवीन गुप्ता यांनी सांगितले. लॉकडाऊन संपल्यानंतरही ट्रकची वाहतूक सुरळीत होण्यास किमान दोन ते तीन महिने लागू शकतात. रिअल इस्टेट क्षेत्राचे या 21 दिवसाच्या काळात किमान 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नॅरडेको या संस्थेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले तर रिटेल उद्योगाचे नुकसान तब्बल 30 अब्ज डॉलरचे झाले असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.