भीमाशंकर कारखान्यासाठी वळसे पाटील- शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
रांजणी -पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. श्री विघ्नहर, संत तुकाराम कारखान्यांच्या निवडणुका पार पडल्या, तर माळेगाव कारखान्यासाठी या आठवड्यात मतदान होत आहे. उर्वरित कारखांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विशेषत: आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याची निवडणूकही 3-4 महिन्यांवर आली आहे.
या साखर कारखान्यांचा निवडणुकीचा ऐन उन्हाळ्यातच धुरळा उडणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. तालुक्याची आर्थिक नाडी असलेल्या भीमाशंकर कारखाना निवडणुकीत कॅबिनेटमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र महाविकास आघाडी झाल्याने कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र येणार का? हा येणारा काळच ठरवेल. मात्र सध्यातरी तसे चित्र पहावयास मिळत नाही.
भीमाशंकर साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. सुमारे 7 लाख टनाची गाळप क्षमता गेल्या वर्षी झाली असली, तरी यंदा उसाच्या कमतरतेअभावी कमी गाळप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदाच्या भीमाशंकर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील काय भूमिका घेणार, याकडे उस उत्पादक सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
कारखाना उभारणीच्या कालखंडात आढळराव पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले हे कोणी नाकारू शकणार नाही. त्यातच आता राज्यात महाविकास आघाडी झाल्याने वळसे पाटील आणि आढळराव पाटील कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येणार का? हा खरा प्रश्न आहे. भीमाशंकर कारखान्याव्यतिरिक्त कर्मयोगी सहकारी आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्यांच्याही निवडणुका होणार आहेत.
मात्र जिल्ह्यातील भीमाशंकर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील महाविकास आघाडीचे कॅबिनेटमंत्री झाल्यानंतर त्यांनी भीमाशंकरच्या अध्यक्षपदाचा काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला. त्यांच्या जागी उपाध्यक्ष असलेले बाळासाहेब बेंडे पाटील यांना अध्यक्षपदाची संधी दिली गेली. 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भीमाशंकर अध्यक्षपदावरूनही शह-कटशहाचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेना लढणार का?
2015 साली शिवसेनेने स्वतंत्र पॅनल उभे करून भीमाशंकर कारखान्याची निवडणूक लढविली होती. त्यावेळी शिवसेनेच्या पॅनलला 35 टक्के तर राष्ट्रवादीच्या पॅनलला 65 टक्के असे मतदान झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. कारखाना स्थापनेपासून पहिल्यांदाच 2015ची निवडणूक दोन पॅनलमध्ये लढविली गेली. 2020च्या भीमाशंकर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अशी निवडणूक होणार का? याकडे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.