राहुरी – नगर-मनमाड महामार्गावरील गुहा (ता. राहुरी) येथे राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या बसेस थांबत नसल्यामुळे विद्यार्थी, महिला, वृद्ध, दिव्यांग, रुग्ण, नोकरदार प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नगर-मनमाड महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर पूर्वीचे बसस्थानक तोडावे लागले. मात्र अजूनपर्यंत जागा उपलब्ध असूनही नव्याने बसस्थानाक बांधण्यात आले नाही. त्यामुळे ऊन, वारा, पावसात प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहण्याची वेळ येत आहे. याठिकाणी अधिकृत थांबा असूनही चालक-वाहक बस थांबवत नाही. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गुहा गाव शिर्डी-शिंगणापूर तीर्थक्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे भाविकांची सतत ये-जा असते. तसेच गुहा गावामध्ये कानिफनाथ महाराजांचे प्रसिद्ध देवस्थान असल्याने जिल्हाभरातून भाविकांचा नेहमी ओढा असतो. मात्र बस थांबत नसल्याने भाविकांना तासनसास ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे खासगी वाहनचालकांची चांगलीच चंगळ होत आहे. गुहा येथील सामाजिक संघटना, तरुणांनी यापूर्वी बस थांब्यासाठी अनेक आंदोलने केली मात्र त्यांच्या मागण्यांना परिवहन विभागाने दाद दिली नाही. त्यामुळे आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा गावातील सामाजिक संघटना व प्रवाशांनी दिला आहे.
गुहा येथून राहुरी, विद्यापीठ, नगर, लोणी, संगमनेर, शिर्डी येथे अनेक विद्यार्थी प्रवास करतात. बस थांबत नसल्याने शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. अहमदनगर आगार प्रमुखांशी पत्रव्यवहार केला. त्यांनी दखल घेऊन लेखी आदेश काढला. मात्र त्यांच्या संबंधित आगार प्रमुखांनी साहेबांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.
साई सोनवणे (विद्यार्थी, गुहा)