वृक्षतोड वनविभागाकडून करण्यात आल्याचा नगरसेवकांचा मुख्य सभेत आरोप
पुणे – तळजाई टेकडी परिसरात वन अथवा बांधकाम विभागाकडून बेकायदेशीरपणे वृक्षतोड झाली असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मुख्य सभेत दिले. दरम्यान, ही वृक्षतोड वन विभागाकडूनच केल्याचा आरोप नगरसेवकांनी केल्याने ही वृक्षतोड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुख्य सभेत चर्चेवेळी नगरसेवक सुभाष जगताप यांनी “तळजाई टेकडीवर मोठ्या प्रमाणावर झाडे कापली गेली आहेत. वनविभागाच्या क्षेत्रावरही ही वृक्षतोड झालेली आहे. त्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक होती,’ असा मुद्दा उपस्थित केला. तर, बांधकामासाठी वृक्षतोड केल्यानंतर पर्यायी झाडे लावली जातात का, त्याची तपासणी कोण करणार? असा प्रश्न नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रशासनाला ही माहिती नाही का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी वृक्ष प्राधिकरण समिती सचिव गणेश सोनुने यांनी राज्यशासनाने वन विभागाला ग्लेरीसिडीयाचे वृक्ष टेकडीवर असल्याने त्याचा फटका इतर झाडांना बसत असल्याने ते काढण्याचे आदेश तसेच अधिकार वन विभागाला देण्यात आल्याचे ते म्हणाले. मात्र, नगरसेवकांनी त्यांच्या या खुलाशावर नाराजी व्यक्त केली तसेच आयुक्तांनी खुलासा करण्याची मागणी केली. त्यावेळी आयुक्तांनीच खुलासा केला.
राव म्हणाले की, तळजाई टेकवडीवरील वनविभागाच्या जागेवरील क्लिरीसिडीया झाडे काढण्यात आली आहेत. त्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाईल. परंतु, राज्य शासनाने वन विभागाला अशी वृक्ष काढण्यासाठी प्राधिकृत केले आहे.
नियमांचे उल्लंघन झालेले असल्यास कारवाई केली जाईल. तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून बेकायदा वृक्षतोड होत असल्यास त्याची तक्रार करावी, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, तसेच पर्यायी वृक्षारोपणाची माहिती घेतली जाईल. पर्यायी वृक्षरोपणासंदर्भात तज्ञ समूहाची मदत घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.