अहमदाबाद – करोनाच्या मोठ्या फटक्यातून भारताची अर्थव्यवस्था मजबुतीने सावरत आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते म्हणाले की जगातील मोठ्या अर्थव्यवस्था करोनाच्या फटक्यातून वाचण्यासाठी मोठे प्रयत्न करीत असताना भारताने मोठ्या प्रमाणात देशात आर्थिक सुधारणा केल्या.
कोविड मुळे संपुर्ण जगाच्याच अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. तसा फटका भारतालाहीं बसला आहे. पण जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था मजबूतीने सावरत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
अहमदाबाद येथे उभारण्यात आलेल्या सरदारधामच्या उद्घाटन प्रसंगी व्हर्चुअल कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की जेव्हा जागतिक सप्लाय चेन विस्कळीत झाली त्यावेळी आम्ही प्रॉडक्शन लिंक्ड सवलती जाहीर करून भारतात नवीन संधी निर्माण केल्या. सध्या ही योजना टेक्सटाईल उद्योगाला लागू करण्यात आली आहे.
देशातील एकूण दहा मोठ्या सेक्टरसाठी या योजनेचा लाभ देण्यात येत आहे असे सरकारचे म्हणणे आहे. त्याचा सूरत सारख्या वस्त्रोद्योगांच्या नगरांना चांगला लाभ होऊ शकतो असे ते म्हणाले. भारतात संधीची कमतरता नाही आपण अधिक मोठी कामगीरी त्यातून करू शकतो. भारत 21 व्या शतकातील मोठी आर्थिक शक्ती असल्याचा दावाही त्यांनी केला. भारत ग्लोबल इकॉनॉमिक लिडर बनण्याच्या क्षमतेत आहे असेही त्यांनी नमूद केले.