नवी दिल्ली – कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक तोफ डागली. आगामी काळात देश तरूणांना रोजगार देऊ शकणार नाही. देशाच्या इतिहासात प्रथमच तसे घडेल. मागील 70 वर्षांत तसे कधीच घडले नव्हते, असे राहुल यांनी म्हटले.
आगामी काळात आर्थिक संकट आणखी गंभीर बनणार असल्याचा इशारा राहुल यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत दिला. करोना संकटामुळे कर्जफेडीसाठी सवलत देण्यात आली आहे. सवलतीचा कालावधी संपल्यानंतर अनेक लहान आणि मध्यम उद्योग बंद पडण्याचा धोका आहे.
देशातील 90 टक्के रोजगार असंघटित क्षेत्रामुळे उपलब्ध होतो. त्या क्षेत्रात लहान आणि मध्यम उद्योगांबरोबरच शेतीचा समावेश आहे. मात्र, ती व्यवस्थाच मोदी सरकारने उद्धवस्त केली आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. करोना संकटामुळे मोठे नुकसान होण्याचा इशारा मी याआधी दिला. त्याला प्रसारमाध्यमांनी चेष्टेचा विषय बनवले. आता देश तरूणांना रोजगार देऊ शकणार नाही, अशी भूमिका मी मांडत आहे. माझ्या भूमिकेशी सहमत नसाल; तर आणखी सहा-सात महिने प्रतीक्षा करा, असे ते म्हणाले.