नवी दिल्ली – देशाची सेवा केल्याचा मला अभिमान आहे, देश निःसंशय संकल्पाने पुढे जात आहे. देशाची प्रत्येक क्षेत्रातील वाटचाल ही लोकांच्या इच्छा आणि आकांक्षाच्या दिशेने सुरू आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी सरकारला नऊ वर्ष नुकतीच पुर्ण झाली आहेत.
त्यानिमीत्त महाजनसंपर्क मोहीमेचा एक भाग म्हणून देशाच्या विविध भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पक्षाने केले आहे. त्यानिमीत्त जारी केलेल्या ट्विटर संदेशात त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.
ते म्हणाले की आपल्याला अशा देशाची सेवा केल्याचा अभिमान वाटतो जो निःसंशय संकल्पाने पुढे जात आहे. बहुपक्षीय व्यासपीठापासून ते आत्मनिर्भर भारत ते ‘मेक इन इंडिया’ पर्यंत, प्रत्येक वाटचाल आपल्या लोकांच्या सामर्थ्याचा आणि आकांक्षांचा पुरावा आहे,” असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधानांनी यावेळी सरकारच्या कामकाजावरील एक लेखही ट्विटर संदेशात प्रसारीत केला आहे, ज्यात राष्ट्र प्रथम ही संकल्पना आणि राष्ट्रीय सुरक्षेला देण्यात आलेले प्राधान्य या विषयावर माहिती देण्यात आली आहे.