पिंपरी -गेल्या एक वर्षापासून सर्व्हर बंद असल्याने नागरिकांना 2015 पूर्वीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली. याबाबत विचारणा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संबंधित ठेकेदाराला फोन लावला. दुसरा फोन आला म्हणून अतिरिक्त आयुक्तांना फोनवर होल्डवर ठेवले. मला साहेबांनी बोलविले आहे, तुम्ही मला नंतर फोन करा, असे उद्धट उत्तर ठेकेदाराने दिले. यामुळे अतिरिक्त आयुक्तांचा पारा चांगलाच चढला.
सोमवारी (दि. 11) ब क्षेत्रीय कार्यालयात चौथी जनसंवाद सभा पार पडली. यावेळी एकूण 22 तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी एका नागरिकाने 2015 पूर्वी विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार केली. हे प्रमाणपत्र न मिळाल्याने पासपोर्ट आणि परदेशात जाण्यासाठी व्हिसाही मिळत नसल्याची कैफियत एका नागरिकाने मांडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता गेल्या वर्षभरापासून पत्र व्यवहार करीत असूनही संबंधित ठेकेदार हा दाद देत नसल्याचे सांगितले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी ठेकेदाराला फोन लावला. ते माझे काम नाही. पण तुम्ही म्हणत असाल तर मी ते काम करून देऊ शकतो.
अतिरिक्त आयुक्तांशी बोलत असताना ठेकेदारास फोन आला म्हणून ठेकेदाराने अतिरिक्त आयुक्तांना होल्डवर ठेवले. त्यानंतर साहेबांनी मला बोलविले आहे, असे म्हणत तुम्ही नंतर फोन करा, असे सांगितले. यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या पारा खूपच चढला. त्यांनी ठेकेदाराला खडे बोल तर सुनावलेच. पण ठेकेदारास दुपारी दोन वाजता आयुक्तांकडे घेऊन या, असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी तिथे उपस्थित असलेल्या महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांनाही सुनावले. तर संगणक विभागाकडून काम होत नसेल तर अतिरिक्त आयुक्तांना सांगा. त्यांच्याकडूनही काम होत नसेल तर मग आयुक्तांना सांगा. एक वर्षभर तुम्ही नागरिकांची कामे का रखडून ठवेली, असा सवालही त्यांनी केला.