पिंपरी – पिंपरीत बाजारात जाण्यासाठी इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. पुलावरून शगून चौकाकडे जाणारा मार्ग दुरूस्तीच्या कारणास्तव वाहतुकीस बंद केला होता. 50 दिवसानंतर हा मार्ग वाहतूकीसाठी सोमवार (दि. 11) रोजी खुला करण्यात आला आहे. यामुळे रेल्वेउड्डाणपूल परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
पिंपरी कॅम्पातील बाजारपेठेसह, पिंपरीगावात, काळेवाडी, पिंपळे सौदागर परिसरात जाण्यासाठी इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूल महत्त्वाचा आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी पुलावरून शगुन चौकाकडी जाणारा मार्ग वाहतुकीस 20 फेब्रुवारीपासून बंद केला होता. त्यासाठी वाहतुकीत बदल करून, रिव्हर रोडने दुहेरी वाहतूक सुरू केली होती. त्यामुळे पुलावरून लिंकरोडच्या दिशेने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागत होत्या.
लोहमार्गावरील इंदिरा गांधी उड्डाणपुलाला चार मार्गिका आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी चौक, मोरवाडी चौक, कॅम्पातील शगून चौक आणि लिंक रस्त्यावरील भाटनगर चौक जोडले गेले आहेत. हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने त्याची गेल्या वर्षापासून टप्प्याटप्प्याने दुरुस्ती सुरू होती. अखेर सोमवारी शगुन चौकाकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला आहे. असे असतानाही पुलाचे शगुन चौकाकडे खाली उतरताना संरक्षक भिंतीचे काम अद्याप बाकी आहे.