मुंबई – मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी अशोक उर्फ भाई जगताप यांची नुकतीच निवड पक्षाकडून जाहीर करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मान्यता मिळताच मुंबई काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई पालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काँग्रेसने मराठा नेते भाई जगताप यांना मुंबईत पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत खोचक टोला लगावला आहे.
काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा आहे. कधी कोणाला खो देतील आणि कधी कोणामुळे कोण बाद होईल हे कोणालाच माहीत नसते. काँग्रेसमध्ये एकदा कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल याकरिता एक मोठा गट तयार असतो. काँग्रेस पक्षाला विरोधक लागत नाही.https://t.co/UKTCw070QO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 22, 2020
निलेश राणे म्हणाले,’काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा आहे. कधी कोणाला खो देतील आणि कधी कोणामुळे कोण बाद होईल हे कोणालाच माहीत नसते. काँग्रेसमध्ये एकदा कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल याकरिता एक मोठा गट तयार असतो. काँग्रेस पक्षाला विरोधक लागत नाही.’
दरम्यान, मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद २०१९ पासून माजी खासदार व ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्याकडे होते. मात्र त्यांच्याबद्दल पक्षातून सातत्याने नाराजी व्यक्त होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यात अनेक नावे शर्यतीत होती. मात्र, जगताप यांनी बाजी मारली आहे. जगताप यांच्यासाठी ही जबाबदारी निश्चितच सोपी नसेल. मुंबई पालिका निवडणुकीसाठी आतापासूनच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने जगताप यांना मुंबईत पक्षाची विस्कटलेली घडी सर्वप्रथम नीट करावी लागणार आहे.