विखे, पाचपुते, राजळेंपाठोपाठ गडाख, शिंदे, औटी, राठोड चर्चेत
नगर – विधानसभेचा निवडणूक निकाल लागून आठ दिवस झाले तरी भाजप-सेनेच्या युतीचा सत्तेचा मुर्हूत अजून ठरेना! यामुळे सत्तेची बेरीज नेमकी कशी जुळवली जाणार, तसेच या समीकरणांवर नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ठरणार असल्याने याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
भाजप-सेना युती झाली तरी नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठींबा दिल्याने तेही भाजपचे राधाकृष्ण विखे, आमदार बबनराव पाचपुते व आमदार मोनिकाताई राजळे यांच्याबरोबर पालकमंत्री पदाच्या स्पर्धेत आले आहेत. शिवाय शिवसेना पारनेरचे विजय औटी व नगर शहराचे अनिल राठोड या दोन पराभूत आमदारांना विधानपरिषदेवर संधी देणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास मग तेही पालकमंत्रीपदावर दावा करतील. शिवाय भाजप आधीचे पालकमंत्री राम शिंदे यांचे पुन्हा पुर्नवसन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या विरोधात ताकद देण्यासाठी शिंदे यांना विधानपरिषदेवर घेवून पालकमंत्रीपदाची पुन्हा संधी दिली जावू शकते.
त्यात पुन्हा भाजप-शिवसेनेचे सुर जुळलेच नाहीत तर,शिवसेना,राष्ट्रवादी व कॉंग्रेस अशा वेगळ्या समीकरणांची चर्चा सुरु आहे.तसे झाले तर भाजपाच्या तिन्ही आमदारांची नावे मागे पडून गडाखांसह औटी,राठोड यांना महत्व प्राप्त होईल. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीच्या यंग ब्रिगेडमधून कुणाला तरी संधी दिली जावू शकते. मात्र मुळात अशा समीकरणांची जुळवणी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. अन असे प्रत्यक्षात गणित कागदावर उतरले तरी कॉंग्रेसने आधीच बाहेरून पाठींब्याचे संकेत व्यक्त केलेत,तर राष्ट्रवादीही तीच भूमिका घेणार आहे. त्यामुळे केवळ सेनाच सत्तेत प्रत्यक्ष झाली तर जिल्ह्यातून सेनेला पाठींबा दिलेले अपक्ष गडाख यांच्यासह औटी व राठोड चर्चेत येतील!
दरम्यान,निकाल लागल्यानंतर भाजपच्या पराभूत सर्व आमदारांनी राजळे व जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद देवू नये अशी मागणी केल्याने जिल्ह्यात विखे यांच्याविरोधातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्ह्यातील भाजपच्या अपयशाला विखे पिता-पुत्र जबाबदार असल्याचा आरोप होवू लागला आहे. त्यामुळे विखे यांच्या मंत्रीपदावर गडांतर येवू शकते. त्यातच काही वृत्तवाहिन्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही विखे यांना मंत्रीपद देण्यास उत्सुक नसल्याचे वृत्त प्रसिध्द केले आहे.
विखे यांचे नाव मागे पडले तर दुसऱ्यांदा आमदार झालेल्या राजळे यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात पालकमंत्री राहिलेले बबनराव पाचपुते आठ दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. सध्या भाजपतच पालकमंत्री पदाची चढाओढ व अंतर्गत कुरघोडी सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपत आलेल्या दोन्ही कॉंग्रेसच्या कुरघोडीचे राजकारण भाजपच्या शिडातही घुसल्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत या सत्ता समीकरणात आता सर्वच पक्षामंधील जिल्ह्यातील आमदारांना पालकमंत्री पदाचे वेध लागल्याने या पदाची स्पर्धा तीव्र झाली आहे.