कोलकता -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी दूर राहिले. देशातील करोना संकटाचा आढावा घेण्यासाठी संबंधित व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली होती.
देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी मोदींनी दोनदिवसीय व्हिडीओ कॉन्फरन्स बोलावली. मोदींनी मंगळवारी काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर बुधवारी उर्वरित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. मात्र, त्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ममता सहभागी झाल्या नाही.
व्हर्च्युअल बैठकीत ममतांना बोलण्याची संधी मिळणार नसल्याने त्यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, व्हिडीओ कॉन्फरन्सपासून दूर राहण्याची जगन यांची कृती चकित करणारी ठरली. सध्या आंध्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे जगन व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
लॉकडाऊन आणि अनलॉकच्या पाऊलांबाबत जगन यांनी आधीच केंद्र सरकारला पत्र पाठवले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, त्या पत्राचा तपशील उघड करण्यात आला नाही.