मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या ५ गुन्ह्यांचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून काढून घेण्यात आला आहे. सिंग यांच्यावर खंडणीची ५ गुन्हे दाखल असून या सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआय करणार आहे. या गुन्ह्यांचा तपास केंद्रीय यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा अशी याचिका सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला असला तरी परमबीर सिंग यांच्या निलंबनाचे आदेश मात्र सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत.
परमबीर सिंग यांच्यावर कोणते गुन्हे?
परमबीर सिंग यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी एप्रिल २०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा समावेश आहे. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना घाडगे हे देखील ठाणे पोलिसांत कर्तव्यावर होते. त्यावेळी सिंग यांनी आपल्याला एका व्यक्तीवरील गुन्हे काढून त्याबदल्यात खंडणी घेण्यास सांगितल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे.
२०२१ जुलै महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये सिंग यांच्याविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. विकासक शामसुंदर अग्रवाल व त्यांचे पुतणे शरद यांनी याबाबत तक्रार दिली होती. अग्रवाल यांनी, परमबीर सिंग व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत आपली छळवणूक करत खंडणी वसूल केल्याचा आरोप केला.
उद्योजक केतन टन्ना व इतर २६ जणांनी केलेल्या आरोपांवरून परमबीर सिंग यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल करण्यात आला होता. टन्ना यांनी, परमबीर सिंग व कुख्यात गुंड रवी पुजाराने धमकावत खंडणी वसूलल्याचा आरोप केला होता.
२० ऑगस्ट २०२१ ला परमबीर सिंग यांच्यावर पाचवा दाखल करण्यात आला. हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवाल यांनी, परमबीर सिंग व निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यांचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार आहे. तपासासंबंधीची सर्व माहिती आठवड्याभरात सीबीआयकडे देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.