कोल्हापूर – पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोघा तरूणांचे मृतदेह सापडले आहेत. गुरूप्रसाद गजानन झगडे (रा. शिनवारपेठ) आणि सुनील सुरेश शिंदे (रा. यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. रंगपंचमी साजरी करून शिंगणापूर (ता. करवीर) बंधाऱ्याजवळ नदीत दोघे तरूण आंघोळीसाठी गेले होते. ते घरी परतले नसल्याने दोघेही पाण्यात बुडाल्याची भिती व्यक्त केली जात होती. अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यात यश आले.
मंगळवारी (दि.22) रंगपंचमी खेळून गुरुप्रसाद मित्रांसमवेत शिंगणापूर बंधाऱ्याजवळ आंघोळीसाठी आला होता. येथे मित्रांसोबत जेवण करून घरी काम असल्याचे सांगून तो निघून आला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी पोहचलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी गुरुप्रसादच्या मोबाईलवर संपर्क केला, सर्वत्र शोधाशोध केली. पण तो सोपडला नाही. दरम्यान त्याचे कपडे व दुचाकी बंधाऱ्याजवळ आढळून आल्याने तो बुडाल्याची भिती व्यक्त केली जात होती. बुधवारी व गुरुवारी रेस्क्यू ऑपरेशन फोर्स व अग्निशमन दलाने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता त्याचा मृतदेह सापडला.
तर यादवनगरातील तरुण सुनील शिंदे हाही मित्रांसोबत शिंगणापूर बंधाऱ्यावर आंघोळीसाठी आला होता. तोही रात्री उशिरापर्यंत घरी पोहचला नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. त्याचे कपडेही नदी काठावर बंधाऱ्याजवळ आढळले. गुरुवारी दुपारी सुनीलचाही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.