नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या १९ महिन्यांत तेलाच्या किमती २९ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. या काळात तेल कंपन्यांनी सहा महिन्यांत १.३२ लाख कोटी नफा कमावला आहे. मात्र त्यांच्या कमाईचा बोजा देशाच्या जनतेवर टाकला जातो आहे अशी टीका कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे.
काही अब्जाधीशांचे खिसे भरण्यालाच केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशात आज महागाई गगनाला भीडली आहे. गरिब आणि मध्यम वर्गाला जगणे कठीण होत चालले आहे.
तथापि, सरकार जनतेला कोणताही दिलासा देण्यास तयार नाही. त्यांची प्राथमिकता काही मोजक्या उद्योगपतींना आहे असे प्रियंका गांधी मोदी सरकारला लक्ष्य करताना म्हणाल्या.
दरम्यान, तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला आलेल्या अपयशानंतर पक्षात काही फेरबदल करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रियंका गांधी यांच्याकडे असलेली उत्तर प्रदेशची जबाबदारी आता अन्य नेत्याकडे सोपवण्यात आली आहे.
त्या आता केवळ सरचिटणीस म्हणून पक्ष संघटनेत सक्रिय राहणार आहेत. त्यांना देशभर प्रचाराला वेळ मिळावा म्हणून असे करण्यात आल्याचा दावा कॉंग्रेसच्या सूत्रांनी केला आहे.