सातारा -बैलगाड्यांच्या शर्यतींवर बंदी असल्याने बळीराजाचे लाखो रुपयांचे पशुधन कवडीमोल दराने विकावे लागत आहे. नांगरटीसारखी शेतीची कष्टप्रद कामे, अमानुष छळ करणारी अवजड ऊस वाहतूक सुरू आहे; प्रसिद्धीसाठी स्टंट करणाऱ्या प्राणिमित्रांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.
ग्रामीण भागाच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलगाडा शर्यती सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
माण-खटावमधील बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मानाजी घाडगे, शहाजी देशमुख, अनिल काटकर, सुनील मोरे, सुधीर जगदाळे, लक्ष्मण लोहार उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, बळीराजा बैलांवर आपल्या अपत्यांप्रमाणे प्रेम करतो. बैलांना पौष्टिक खुराक देऊन त्यांची उत्तम देखभाल करतो. बैल हा शेतकऱ्यांसाठी पाळीव प्राणी आहे; परंतु वन्यप्राण्यांमध्ये समावेश केला.
गेल्याने तथाकथित प्राणिमित्रांचे फावले आहे. यांत्रिक शेतीच्या युगात बैलांचे महत्त्व आणि पैदास कमी होत आहे. वास्तविक बैलगाडा शर्यतींपेक्षा अवजड ऊस वाहतुकीमुळे बैलांचा अमानुष छळ होतो. नांगरटीसारखी शेतीची मशागतही कष्टप्रदच आहे; परंतु नियम आणि अटींच्या अधीन राहून होणाऱ्या बैलगाडा शर्यतींमध्ये बैलांना त्रास दिला जात नाही. जनावरांचे अवैध कत्तलखाने सुरू आहेत. त्यावर बंदीची कारवाई होत नाही.
प्रसिद्धीसाठी स्टंट करणाऱ्या प्राणिमित्रांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बैलगाडा शर्यतींवर बंदी आली आहे. तकलादू कारणांसाठी बंदी घालण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी मी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभत आहे.