वाई (प्रतिनिधी) – वाई तालुक्याच्या अतिदुर्गम पश्चिम भागातील जोर-धनगर वस्ती येथे मंगळवारी (दि. 16) सायंकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बैल जागीच ठार झाला. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागाने बिबट्याला पकडावे, अशी मागणी होत आहे.
जोर येथील धनगर वस्तीवरील गणेश पाकू ढेबे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी आपल्या शेतात कामासाठी बैल घेऊन गेले होते. ते काम संपवून सायंकाळी साडेसहा वाजता घरी येत असताना लगतच्या दाट जंगलातून आलेल्या बिबट्याने बैलावर अचानक हल्ला केला.
यामध्ये बैल ठार झाला, तर आपला जीव वाचवण्यासाठी गणेश ढेबे घराकडे पळून गेले. त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर बुधवारी एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, या भागात गहू काढणी व भरडणी सुरू असल्याने शेतकरी दिवसभर शेतात असतात. त्यांच्यासोबत जनावरेही असतात; परंतु बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत.