वाई पालिका सर्वसाधारण सभा: तीर्थक्षेत्र आघाडीचा सभात्याग
वाई – भाजपच्या अभिनंदनाचा ठराव झोंबल्याने तसेच सोमवारी स्थायी समितीच्या निवडीमध्ये झालेला पराभव जिव्हारी लागल्यानेच वड्याचे तेल वांग्यावर काढत तीर्थक्षेत्र विकास आघाडीने प्रोसिडिंग अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत सभात्याग करून सर्वसाधारण सभा तहकूब करण्यास भाग पाडले. यावेळी वाई विकास महाआघाडी व तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने काही काळ वातावरण तंग होवून कामकाज बंद करण्यात आले.
नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष अनिल सावंत व मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत माजी आमदार मदन भोसले यांनी वाई शहरातील फुलेनगर ते वाई यांना जोडणारा किरवे ओढ्यावर बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये, नगरपालिका शाळा क्रमांक चारसाठी चार कोटींचा निधी आणल्याने भाजपच्या सर्व नगरसेवकांनी अभिनंदनाच ठराव मांडला.
यावर निधी आल्याचे लेखी पत्र सभागृहापुढे वाचून दाखविण्यात यावे अन्यथा अभिनंदनाचा ठराव व शहरात लागलेले अभिनंदनाचे लावलेले फ्लेक्स बोर्ड काढून घेण्यात यावेत असा पवित्रा विरोधक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या नगरसेवकांनी घेतला. तसेच नगराध्यक्षा व प्रशासनाला धारेवर धरत आमचा अभिनंदनाला विरोध नसून चुकीचा पायंडा पाडला जावून वाईकर नागरिकांची दिशाभूल करण्यात येवू नये अशी भूमिका घेतली. मात्र, प्रशासनाने वाई नगरपालिकेला वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून पाच कोटी पन्नास लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे पत्र वाचून दाखविण्यास सुरुवात करताच काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विरोधकांनी मागील प्रोसिडिंग वाचून दाखविण्याची मागणी केली. प्रोसिडिंग अपूर्ण असल्याचे प्रशासनाने सांगताच मागील सर्व सभांचे प्रोसिडिंग पाहण्याचा आग्रह धरत सभात्याग केला.
राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर
सभात्याग करीत असताना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या महिला सदस्यांनी सभात्याग करण्याच्या ठरावाला विरोध दर्शविला. त्यांनी विषय पत्रिकेवरील नावेचीवाडी, सिद्धनाथवाडी, सोनगीरवाडी प्रभागातील कामाच्या विषयांना मंजुरी देण्यात येवून मगच सभात्याग करावा, असा पवित्रा घेतल्याने तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट पडल्याचे प्रामुख्याने जाणविले. तसेच येणाऱ्या थोड्याच दिवसांत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकदा बॅकफूटवर येत असल्याचे चित्र दिसत आहे. वाई शहरात राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.