निगडी -स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन चरित्र हे धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळा समान होते. त्यांच्या स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म, स्वनिष्ठा या विचारांशी समर्पित होऊन त्याप्रमाणे आचरण केले गेले पाहिजे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या निगडीतील मॉडर्न शैक्षणिक संकुलात आयोजित वसंत व्याख्यानमालेत “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. अरविंद पांडे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, नियामक मंडळ सदस्य दीपक मराठे उपस्थित होते.
सोलापूरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बालपण, प्रचंड बुद्धीमत्ता, वाचन, बालवयातच काव्य साहित्य रचना, त्यांचे संघटन व कार्य यावर प्रकाश टाकला. प्रा. निकिता गायकवाड यांनी ईशस्तवन सादर केले. नियामक मंडळ सदस्या मृगजा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रोहित गुरव यांनी सूत्रसंचालन केले. लीना पगारे यांनी आभार मानले.