नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणावर चांगलेच तोंडसुख घेत सरकारची खिल्ली उडवली आहे. हे आर्थिक सर्वेक्षण छापील स्वरूपात प्रसारित करायचे नाही असे जो निर्णय सरकारने घेतला आहे तोच त्यांचा सर्वोत्तम निर्णय म्हणावा लागेल. आपल्या सरकारने दूरदृष्टीने विकासाचे निर्णय घेतले म्हणूनच देशाच्या आर्थिक व्यवस्थेत आता सुधारणा दिसून येऊ लागल्या आहेत, असे स्वतःच नमूद करून सरकारने स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विटर अकौंटवर त्यांनी या संबंधात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की देशाच्या एकूण आर्थिक स्थितीची माहिती देशातील नागरिकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी देशात एकेकाळी हे आर्थिक सर्वेक्षण छापील स्वरूपात वितरित केले जात असे.
पण या वेळेच्या सर्वेक्षणाचा हेतू मात्र भलतेच काही तरी भासतो आहे. पण हा नेमका काय हेतू आहे हेही यातून स्पष्ट झालेले नाही. सरकारने शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण जाहीर केले पण ते यावेळी छापील स्वरूपात सादर केले गेलेले नाही. त्याची डिजिटल आवृत्ती प्रसारित केली गेली असल्याचे सरकारने म्हटले आहे.