जादा चपाती देण्यास अनेक शिवभोजन केंद्रांवर नकार
पिंपरी : राज्यातील गरीब व गरजूंना सवलतीच्या दराने जेवण मिळावे यासाठी विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांसाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने तातडीने या आश्वासनाची पूर्तता करत राज्यात सर्वत्र शिवभोजन थाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, शिवभोजन थाळीत मिळणाऱ्या जेवणाने लाभार्थ्याचे पोट भरत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीचा लाभार्थी अर्धपोटी म्हणण्याची वेळ आली आहे.
शिवभोजन थाळीमध्ये दोन पातळ चपात्या, एक वाटी भात, एक वाटी दाळ दिली जाते. या जेवणात बऱ्याच लाभार्थ्यांचे कष्टकरी नागरिकांचे पोट भरत नसल्याने त्यांना अर्धपोटीच रहावे लागत आहे. तर, बऱ्याच शिवभोजन केंद्रांवर जादा चपाती देण्यास केंद्रचालकांकडून नकार दिला जात आहे. तसेच काही केंद्रांवर दुपारी बारा वाजता शिवभोजन थाळी मिळण्यासाठी रांगेत उभा असेल तरच थाळी मिळते. दुपारी दीड किंवा दोनच्या दरम्यान गेलो तर थाळी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या शिवभोजन योजनेची अंमलबजावणी राज्यभर सुरू करण्यात आली आहे. या योजनेला राज्यातील नागरिकांकडून मोठा प्रतिसादसुद्धा दिला जात आहे. मात्र, शासनाचे अनुदान घेणाऱ्या शिवभोजन केंद्रचालकांकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या तुलनेत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. अल्पावधीतच ही योजना लोकप्रिय झाल्याने दुसऱ्या टप्प्यात शासकीय रुग्णालये, बस स्थानके व गर्दीच्या ठिकाणी 26 जानेवारीपासून शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले.
मात्र, केंद्रचालकांकडून नागरिकांना दर्जेदार जेवण मिळणे अपेक्षित आहे. परंतु ते मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या योजनेत ग्रामीण भागासाठी 25 थाळी तर, शहरी भागासाठी 40 थाळी याप्रमाणे अनुदान दिले जात आहे.
मात्र, केंद्रचालक अरेरावी करत नागरिकांना जादा पैसे देऊनही चपाती मागितल्यास देण्यास नकार देत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रार कुठे करायची याची माहिती नसल्याने केंद्रचालकांची आरेरावी वाढत आहे. आता यावर राज्य सरकार काय तोडगा काढणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य सरकारने खूप चांगली योजना सुरू केली आहे. मात्र, शिवभोजन केंद्रचालक निकृष्ट दर्जाचे जेवण देत आहेत. ही थाळी खायला कष्टकरी नागरिक मोठ्या संख्येने जातात. मात्र, दोन चपाती व एक वाटी भातात पोट भरत नाही. तर, जादा पैसे देऊनसुद्धा अन्न मिळत नाही. याबाबत राज्यसरकारने काही तरी तोडगा काढणे अपेक्षित आहे.
– तुकाराम ठोंबरे, शिवभोजन थाळी, लाभार्थी