नवी दिल्ली – हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या मध्यवर्ती भागात कॉंग्रेसने बुधवारी शांतताफेरी काढली. शांतताफेरीचे नेतृत्व करणाऱ्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
कॉंग्रेसच्या मुख्यालयापासून निघालेली शांतताफेरी पोलिसांनी मध्येच रोखली. त्यानंतर प्रियांका यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. देशाच्या राजधानीत शांतता अबाधित ठेवण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची आहे. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.
गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आम्हाला त्यांच्या निवासस्थानापर्यंत शांतताफेरी काढायची होती. पण, पोलिसांनी आम्हाला रोखले. केंद्र सरकारने पाऊले उचलून दिल्लीत शांतता प्रस्थापित होण्याची निश्चिती करावी. रोजगाराच्या शोधात देशभरातून लोक दिल्लीत येतात.
मात्र, त्याच शहरात द्वेष आणि आग फैलावली जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसने पुढाकार घेतला. त्यामुळे देशात शांतता आणि सलोख्याची निश्चिती करणे हे आपले कर्तव्य आहे. कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रेमाचा आणि बंधुभावाचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवावा, असे आवाहनही प्रियांका यांनी केले.