सागवानी लाकडाचे प्रवेशद्वार बसविण्याचा सोहळा उत्साहात
पुणे – सोनोरी गाव (ता. पुरंदर) येथील मल्हारगडावर राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने सागवानी लाकडाचे प्रवेशद्वार बसविण्याचा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. हा दरवाजा आणि सोहळ्यासाठी परिवारातील प्रत्येक मावळ्याने आणि रणरागिणीने अथक परिश्रम घेतले आहे तसेच निधीही जमा केला आहे.
यानिमित्त गडावर भंडाऱ्याची उधळण करीत पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फुलांच्या वर्षावात छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला. तसेच शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो दुर्ग संवर्धक, गडप्रेमी तसेच इतिहासकार उपस्थित होते.
याप्रसंगी छत्रपती शिवराय, जिजाऊ माता, जेजुरीचा खंडेराया, माळसा, बानु तसेच सरदार आणि मावळे यांचा समावेश परिधान केलेले मावळे आणि रणरागिणी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. सन 1757 ते 1760 या दरम्यान सरदार कृष्णराव पानसे आणि भीमराव पानसे यांनी हा किल्ला बांधला.
राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने मल्हारगड येथे दुर्ग संवर्धनाचे कार्य चालू आहे तसेच सण 2014 पासून महाराष्ट्रातील विविध 30 जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त किल्ल्यांवर 2550 जास्त मावळे तसेच आणि 350 पेक्षा जास्त रणारागिणींच्या साहाय्याने राजा शिवछत्रपती परिवाराचे कार्य सुरू आहे. याशिवाय सामाजिक कार्यातही हातभार लावत आहे.
राजा शिवछत्रपती परिवाराची सुरुवात ही एका फौजी मार्फत करण्यात आली आहे. हे कार्य जनमानसामध्ये समजावे म्हणून व सुज्ञ मंडळी एकत्र यावेत म्हणून फेसबुक, युट्यूब, ट्विटर आधीच सोशल मीडियावरही आपले राजा शिवछत्रपती परिवार या नावाने अधिकृत खाते आहे.