मुंबई – औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली. यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी या दोन्ही जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्यामुळे आम्ही उचललेल्या पावलांमुळे हे शक्य झाले असे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे, तर भाजप-शिंदे यांची सत्ता आल्यानंतर नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर या दोन्ही शहरात एकच जल्लोष करण्यात आला. पण यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दानवेंच्या या प्रश्नाचे निरसन केले.
अंबादास दानवे यांनी त्या निर्णयाचा फोटो त्यांच्या ट्विटरला शेअर केला होता. तर त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत म्हटले की, हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल, तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. तालुका छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा औरंगाबाद, असे यापुढे लिहावे लागेल का? हेही देवेंद्र फडणवीसांनी सांगावे.
यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण देताना म्हणाले की, अंबादास दानवेंनी आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्यावी. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे “छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे “धाराशिव’ असे नामकरण झाले आहे.