डेहराडून – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तथापि उत्तराखंड राज्याला आत्मनिर्भर करण्यासाठी आपण कार्यरत राहु असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर कोश्यारी पुन्हा आपल्या मूळ राज्यात परतले असून आज ते प्रथमच पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केली.
आपण प्रवासाला आणि दैनंदिन कामकाजाला प्रकृतीच्या कारणामुळे कंटाळलो होतो. त्यामुळे राज्यपाल पदावरून आपल्याला मुक्त करावे अशी विनंती आपण पंतप्रधानांकडे केली होती अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की दिवसातल्या 24 तासांपैकी आपण जर 16 तासही कामकाजासाठी वेळ देऊ शकत नाही तर तो गुन्हा आहे म्हणून मी हा राजीनामा दिला असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील वादग्रस्त विधानांविषयी विचारले असता ते म्हणाले की जर मी कोणत्याहीं बाबतीत चूक केली असेल तर लहान मुलाचीहीं माफी मागण्यास आपण कचरणार नाही. आपल्या तोंडून अनावधानाने आणि उत्साहाच्या भरात काही वेगळे बोलले गेले तर त्याबद्दल आपण जाहीर माफीही मागितली आहे असे त्यांनी नमूद केले.
आपण सावित्रीबाई फुले किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काहीही आक्षेपार्ह बोललो नाहीं असा खुलासाही त्यांनी केला. राज्यपाल होताना आपण भाजपचा राजीनामा दिला होता, पण आपण अजूनही त्या पक्षाच्या तत्वांचाच पुरस्कार करीत राहू असे ते म्हणाले. भाजपकडून मिळालेल्या संधीबद्दल आपण कृतज्ञ आहोत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.