दुबई – करोनावर रामबाण उपाय ठरेल अशी लस मिळाली तरच पुढील वर्षीच्या आयपीएलसाठीचा लिलाव आयोजित केला जाणार आहे, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या मार्च महिन्यात होणारी आयपीएल करोनामुळे लांबणीवर टाकली गेली होती. ती आता अमिरातीत खेळवली जात आहे. या स्पर्धेसाठीचा लिलावही रद्द झाला होता व सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंना संघात कायम राखले होते. आता करोनाचा धोका देशात कमी झाल्याचे दिसत असले तरीही कोणताही धोका पत्करला जाणार नाही. यावर लस उपलब्ध झाली तरच हा लिलाव पूर्वीप्रमाणे मोठ्या स्तरावर आयोजित करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
पुढील वर्षीच्या लिलावाचे स्वरूपही निराळे राहणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असून आणखीही काही खेळाडू हाच निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यावेळी विविध संघ आपल्या काही खेळाडूंना मुक्त करण्याची शक्यता असल्याने त्यांचा निर्णय जाहीर झाल्यावरच पुढील वर्षीच्या स्पर्धेबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
पुढील वर्षीची स्पर्धा ठरल्याप्रमाणे मार्च महिन्यातच सुरू होइल. मात्र, त्यावेळी सर्व संघांना किमान तीन देशी वा परदेशी खेळाडू कायम ठेवता येणार असल्याने ते किती खेळाडू मुक्त करतात यावर लिलावाचे स्वरूप अवलंबून राहणार आहे. मात्र, सध्या तरी अमिरातीत सुरू असलेल्या स्पर्धेवरच लक्ष केंद्रित केले असून बाकी निर्णय येत्या काळात घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.
भारतातच होणार स्पर्धा…
यंदाची स्पर्धा करोनाच्या धोक्यामुळे देशाबाहेर घेतली गेली. देशात करोनाचा धोका वाढत होता व त्याचवेळी युएईमध्ये हा धोका अत्यंत अल्प होता, त्यामुळे तीथे स्पर्धा घेतली गेली. पुढील वर्षीची स्पर्धा मात्र, भारतातच घेतली जाणार असल्याचे संकेतही गांगुली यांनी दिले.