जाधववाडी – प्रभाग रचना बदलल्याने जाधववाडी परिसरातील नव्या इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांना नागरिकांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचणे म्हणजे मोठे आव्हान झाले आहे. विद्यमान नगरसेवकांना निवडणूक लढविण्याचा अनुभव असल्याने त्यांच्या “गडावर’ अद्याप शांतता असली तरी नवख्यांनी मात्र धावपळ सुरू केल्याचे चित्र विविध प्रभागांमध्ये दिसून येत आहे. संक्रांतीनंतर हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू झाला असून, विविध प्रकारच्या भेटवस्तूंच्या वाटपाची जणूकाही स्पर्धाच रंगल्याचे पाहावयास मिळत आहे.
जाधववाडी- चिखली परिसरात सध्या हळदी कुंकवाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून साड्यांसह विविध आकर्षक भेटवस्तू दिल्या जात असल्याने महिलांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. निवडणुकीला आणखी कालावधी असला तरी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष भेटीवर इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांची जोर दिल्यामुळे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची जाहिरातबाजीही जोर धरू लागली आहे.
अनेक इच्छुकांनी प्रभाग रचना अंतिम होण्यापूर्वीच कंबर कसली असून नागरिकांच्या मनापर्यंत व घरापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नासाठी कुटुंबातील मतदारसंख्या नावे व दूरध्वनी क्रमांकांची नोंदणीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून चालविली जात आहे.
संक्रांत आणि हळदी कुंकवाचा सण खरेतर महिलांचा सण म्हणून ओळखला जातो. परंतू नवखे इच्छुक पुरुष उमेदवार आल्या सौभाग्यवतींना पुढे करू हा कार्यक्रम करत असले तरी आपली छबी निर्माण व्हावी, ओळख व्हावी म्हणून कार्यक्रमांमध्ये इच्छुकांचाही वावर चांगल्या प्रमाणात पहावयास मिळत आहे.
स्वयंघोषितांची मांदियाळी
भावी नगरसेवक, समाजसेवक, विकासाचा चेहरा यासारख्या अनेक बिरुदावल्या इच्छुकांच्या नावाच्या अगोदर लागू लागल्याने प्रभागत होणारी फलकबाजीही आता चर्चेचा विषय बनली आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा महिलांसाठी आयोजित करून सण-उत्सावाची जपणूक करत असल्याचा आव आणला जात असला तरी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या मतांचा जोगवा आपल्याच झोळीत पडावा यासाठीच ही धडपड असल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग रचनेतील बदल अडचणीचा
सन 2017 साली झालेली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार सदस्यांची प्रभागरचना होती. तर आता 2022 सालच्या महापालिका निवडणुकीसाठी 3 सदस्यांचा प्रभाग असणार आहे. त्यामुळे 2017 सालच्या प्रभाग रचनेत मोठा फेरबदल झाला आहे.
गतवेळची प्रभागरचना ग्राह्य धरून ज्या इच्छुकांनी गेल्या वर्षभरापासून तयारी चालविली होती. त्यावर पूर्णत: पाणी फेरले गेल्याने नव इच्छुकांची मोठी धांदल उडाली आहे. तयारी केलेला बहुतांश भाग दसऱ्याच प्रभागाला जोडला गेल्याने वर्षभराची मेहनत आणि अर्थकारण वाया गेले आहे. त्यातच निवडणुकीला आता दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने एवढ्या कमी वेळेत सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी चालविली आहे.