शर्मिला जगताप
माणूस कोंबडी किंवा अन्य पक्षी मारून त्यावर ताव मारीत असला, तरी पाखरांसाठी तो वेडा बनतो. त्यांच्यात रमतो. पशुपक्षी त्याच्या जीवनाचा एक अटळ भाग बनतो. पोपट पाळणारी कितीतरी माणसे असतात. त्याच्याशी ती बोलतात. त्याला खेळवतात. त्याच्या सुख-दुःखाशी समरस होतात. तो पक्षी मेला तर ते कमालीचे दुःखी बनतात. कुत्र्यामांजरांबद्दल असेच घडते. कुठले प्राणी कुठून तरी येतात. घरात चार-आठ दिवस राहिले की लळा लावतात.
काही पाखरे नियमाने भेटतात. प्रेम निर्माण करतात. तर काही पाखरे मोठी गिर्रेबाज असतात. येतात, दिसतात आणि त्याच वेगाने दिसेनाशी होतात. “अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवून जाती’, असा त्यांचा प्रवेश आणि परतणे असते. आज कोण्या पाखराने माझ्यासमोर पंख फडफडवले आणि चटका लावला अशातला बिलकूल भाग नाही. पण काय झाले की टीव्हीवर पाहिले, आणि ती पाखरे नजरेसमोर आली. केनियात एक निसर्गसुंदर सरोवर आहे. पण त्यातले पाणी दूषित झाले. ज्याला जलप्रदूषण म्हणतात तो प्रकार.
पाणी खराब झाले आणि बरेच काही बिघडले. या सरोवराच्या अवतीभोवती फ्लेमिंगो, पेलिकन यासारखे लाखो पक्षी होते. जवळपास चारशे जातीचे लाखो पक्षी. पण सरोवरातील पाणी घाण झाले. त्या घाण पाण्याचा पक्ष्यांवर परिणाम झाला. काही पक्षी मरण पावले. आपले जातभाई मरून पडलेले पाहून इतर पक्षी सावध झाले. त्यांनी स्थलांतरास प्रारंभ केला. खूप पक्षी हा भाग सोडून अन्य ठिकाणी गेले.
बऱ्याच काळाने सरकारच्या हे लक्षात आले. आता तातडीच्या उपाययोजनांद्वारा सरोवर स्वच्छ करण्यात आले. अनेक पक्षी तज्ज्ञांना असे वाटते की, प्रदूषणामुळे वैतागून दूर गेलेले पक्षी कधीतरी नक्कीच परत येतील. ते पक्षी खरोखर परत येतील का? नक्की सांगणे कठीण. पण माणसाला नेहमीच वाटतं गेलेली पाखरे परत येतील. काही पाखरांच्या बाबतीत तसे असते. ती सुगी आली की येतात. हंगाम संपला की जातात. पण ती जातच वेगळी ज्याने वेड लावले त्या पाखराबद्दल मात्र माणूस “पाखरा येशील कधी परतुनी’ अशी ओळ आळवीत असतो.
पाखरांचीच गोष्ट असली तरी मला मोठं नवल वाटते. पाखरे जीवनात येतात, जातात. माणसाला ती दूर गेल्यावर का ओढ लावतात. ती बरोबर असेपर्यंत तो विशेष त्यांची चिंता का करीत नाही? केनियातील प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट तीव्रतेने जाणवली. पाणी गढूळ, दूषित होणे हाच खरा धोका आहे. पाण्याचा वा जीवनाचा प्रवाह कसा स्वच्छ, मुक्त हवा. मग पाखरे येतील, मुक्तपणे, स्वच्छंदी बागळतील.