चामोलीमधील दुर्घटनेने पुन्हा एकदा निसर्गातील मानवाच्या हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विकासाच्या प्रारुपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिमालयातील उंच पर्वतमय परिसरात धरणे, जल वीजनिर्मिती प्रकल्प उभारू नयेत अशी सूचना यापूर्वीच अनेकदा तज्ज्ञांनी केली आहे. पण राज्यकर्त्यांकडून अशा सूचना गांभीर्याने घेतल्या जात नसतील तर अशा आपत्ती थांबवणार कशा? आज जागतिक तापमानवाढीमुळे हिमकडे कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये चूक निसर्गाची नसून आपण निसर्गाशी चुकीच्या पद्धतीने वागत आहोत.
उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील जोशीमठ येथील रैनी गावातील डोंगरावरील नंदादेवी हिमशिखराचा हिमकडा कोसळून धौलीगंगा, अलकनंदा आणि ऋषीगंगा या नद्यांना मोठा पूर आला. ऋषीगंगा ही धौलीगंगाची उपनदी आहे. या महापुरात ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून तो वाहून गेला आहे. याचबरोबर तपोवन विष्णूगड प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानीही झाली आहे. या महापुराने नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे. नदीलगतच्या गावांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाण्याची पातळी वाढल्याने त्या भागातील पाच पूलही वाहून गेले आहेत. उत्तराखंडमधील पौरी, टेहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार आणि डेहराडून या शहरांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ऋषीगंगा धरणाची उंची नदीपात्राच्या उंचीपेक्षा 29 मीटरने जास्त होती. हे धरण धौलीगंगा नदीवर बांधले जात होते. या ऋषीगंगा प्रकल्पातून 63 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. गेल्या दहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू होते. तपोवन विष्णूगड हा जलविद्युत प्रकल्पदेखील 70 टक्के पूर्ण झालेला होता. पण यातील जवळपास 60 टक्के बांधकाम वाहून गेलेले आहे. 2006 मध्ये बांधकामास सुरुवात झालेला हा प्रकल्प सुमारे 13 हजार 500 कोटी रुपयांचा आहे. 2013 मध्ये केदारनाथमध्ये जलप्रलय झाला होता. त्या जलप्रलयामुळेही हे प्रकल्प बाधित झाले होते, त्यांचे मोठे नुकसान झाले होते. तरीही त्यातून आपण कोणताही धडा घेतला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
तपोवन विष्णूगड हा प्रकल्प तपोवन गावाशेजारी आहे. हा प्रकल्प 3100 चौरस मीटर पर्वतीय कॅचमेंट एरियामध्ये आहे. हा प्रकल्प नंदादेवी नदीखोऱ्यातील आहे. यातील पाणी नंतर ऋषीगंगा नदीमध्ये येते. या संपूर्ण प्रकल्पातील 46 टक्के कॅचमेंट एरिया बर्फाने झाकलेला असतो. नंदादेवी पर्वतापर्यंत हे क्षेत्र आहे. नंदादेवी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत उंच शिखर आहे. इतक्या उंच शिखरावर प्रकल्प उभे करताना आपण निसर्गाचा कोणताही विचारच केलेला नाही. केवळ मानवी विकास आणि मानवी गरजांना केंद्रस्थानी ठेवून आपण निसर्गात हस्तक्षेप करत असून त्याची हेळसांड करत आहोत. पुराचे पाणी जेव्हा ऋषीगंगा प्रकल्पात शिरले त्यावेळी प्रकल्पातील कालव्यात 100 हून अधिक कामगार काम करत होते; तर बोगद्यात 60 कामगार काम करत होते. त्यातील काहींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
या महापुरामुळे खाली आलेला राडारोडा, चिखल पाहिल्यास त्यात हिमनग, माती, दगड-धोंडे आहेत. या राडारोड्यामध्ये अनेक जण गाडले गेले असण्याची भीती आहे. माणसांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला हा इतका राडारोडा आला कोठून? हा राडारोडा केवळ नदीपात्रातच आलेला नसून बोगद्यांमध्येही 150 मीटरपर्यंत आत शिरले आहे. साहजिकच या बोगद्यात काम करणाऱ्या कामगारांनाही त्याचा धोका निर्माण झाला आहे.
ही झाली दुर्घटनेची पार्श्वभूमी. पण ती का घडली? याचे मुख्य कारण आहे जागतिक तापमानवाढ. हिमकडे कोसळण्याचे प्रमाण तापमानवाढीमुळे विलक्षण प्रमाणात वाढत चालले आहे. येत्या काही दशकांमध्ये हे हिमकडे नामशेष होतील, अशी भीती शास्त्रज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केली असून त्यासंदर्भात इशारेही दिलेले आहेत. ध्रुव प्रदेशावरचा जवळपास 80 टक्के बर्फ आजमितीला वितळून संपुष्टात आला आहे. हिमालयामध्येही मोठ्या प्रमाणावर हिमकडे आणि हिमनग वितळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
सन 1975 ते 2000 या कालावधीत जागतिक तापमानवाढीमुळे जवळपास एक चतुर्थांश हिमनग वितळून गेले आहेत. पण 2000 सालानंतर अर्धा मीटर हिमकडे वितळून गेल्याचे दिसून आले आहे. आता दरवर्षी अर्धा मीटर हिमकडे वितळत आहेत. याचाच अर्थ ज्या गोष्टीसाठी पूर्वी 10-15 वर्षे लागत असत, ते आता वर्षभरातच घडू लागले आहे. 2000 किलोमीटर लांबीच्या 650 हिमकड्यांचा शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हिमकड्यांचा 25 टक्के भाग 40 वर्षांत नष्ट झाला आहे. आता येणाऱ्या काही वर्षांनंतर हिमकडे इतिहासजमा होण्याची भीती आहे.
2000 ते 2016 या कालावधीत तापमान एक अंश सेल्सियसने वाढले आहे. जागतिक तापमान कमालीच्या वेगाने वाढत चालले असूनही त्याकडे कुणीही फारसे गांभीर्याने पाहत नाही. कार्बन शोषणाच्या मुद्द्यावर आजही पराकोटीची अनास्था आहे. कार्बन डायऑक्साइड कमीत कमी प्रमाणात उत्सर्जित होईल याविषयीही फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. त्यामुळेच गेल्या 16 वर्षांत जागतिक तापमान 1 अंश सेल्सियसने वाढले आहे.
आज हिमालयातच नव्हे तर आशिया खंडातील हिंदकुश पर्वत, तामीर पर्वत या पर्वतरांगेतील हिमकडे आणि हिमनद्याही प्रचंड वेगाने वितळू लागल्या आहेत. हे सर्व पाणी समुद्रात येत असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे. जागतिक समुदायाने याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास पृथ्वीतलावरील 27 देश बुडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी या भागातील 80 कोटी लोकसंख्या हिमनद्यांवर अवलंबून आहे. हे लक्षात घेता या हिमनद्या अबाधित राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्या वितळून नष्ट झाल्या तर ही सर्व लोकसंख्या तर बाधित होणारच आहे; पण त्याचबरोबरीने हे प्रकल्पही मृत होणार आहेत. कारण तिथे पाणीच राहणार नाहीये. याबाबत वारंवार इशारे, सूचना देऊनही त्याबाबत ठोस उपाययोजना होत नाहीयेत, ही दुर्दैवाची बाब आहे.
चामोलीमधील दुर्घटना असो किंवा मागील काळात पश्चिम महाराष्ट्रात आलेला महापूर असो; यामध्ये प्रचंड प्रमाणात राडारोडा, चिखल आलेला पाहायला मिळाला. याचे कारण काय? सध्या उत्तराखंडामध्ये चारधाम महामार्ग परियोजनेचे काम सुरू आहे. हा महामार्ग 900 किलोमीटरचा असून तो गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ या तीर्थक्षेत्रांना जोडणारा आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या परिसरातच गंगा, यमुना, अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांची उगमस्थाने आहेत. पर्यावरणशास्त्र असे सांगते की नद्यांची उगमस्थाने बाधित करू नका. नदीच्या पात्रापासून किमान 25 किलोमीटर अंतरापर्यंत कसलीही बांधकामे केली जाऊ नयेत अथवा कसलेही प्रकल्प उभे केले जाऊ नयेत. ते आहे तसे नैसर्गिक स्थितीत ठेवा. परंतु आज आपण 25 किलोमीटरवरून पाच किलोमीटरपर्यंत आलो आहोत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी तर नदीच्या पात्रात प्रकल्प उभे केले जात आहेत.
पर्यावरणशास्त्राने इतके दाखले देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत आपण विकासाचा रेटा पुढे न्यायचा का, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. नद्यांच्या उगमस्थानांवर प्रकल्प उभे केल्याने या उगमस्थानांना धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे, या महामार्गासाठी 56 हजार वृक्ष तोडले जाणार आहेत. यापैकी 35 हजार वृक्ष आतापर्यंत नष्ट झाले आहेत. या भागात दगडाळ पर्वतही आहेत. तेथे ब्लास्टिंगचे काम सुरू आहे. 90 अंशांमध्ये पर्वत कापण्याचे काम सुरू आहे. आज अत्याधुनिक यंत्रसामग्रीने काही तासात निसर्गनिर्मित पर्वत खाली आणले जाताहेत. यातून तयार झालेला राडारोडा याच नद्यांमध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे या चार नद्यांचे प्रवाहही खंडित झाले आहेत. याला आपण विकास म्हणायचा?
उत्तराखंडमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 125चे विस्तारीकरणाचे कामही सुरू आहे. यासाठी जवळपास 6 हजार 900 झाडे तोडण्यात आली आहेत. या सर्वांचा परिणाम आता हिमालयात दिसू लागला आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन सुरू झाले आहे. खरे पाहता हिमालय हा भूकंपप्रवण क्षेत्राचा भाग आहे. सह्याद्रीप्रमाणे तो टणक किंवा कणखर नाही. त्यामुळे तेथील जंगलतोड आणि वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे. कारण या जंगलांनी, झाडांनी या पर्वताची माती घट्ट पकडून ठेवलेली आहे. पण आपण विकासाच्या हव्यासापोटी ही झाडेच तोडून टाकत असल्याने ती माती सैल झाली आहे आणि त्यातून तेथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होत आहे.
– प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर