पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदत मिळणार केव्हा; शेतकऱ्यांचा प्रशासनाला प्रश्न
सर्वच पक्ष सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत मश्गुल
अवकाळी पावसाने बळीराजा झाला हतबल
नगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 19 दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी, नवे सरकार अद्याप सत्तारूढ झाले नाही. सरकार बनविण्यासाठी सुरू असलेल्या लगबगीत राज्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात हाता-तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्याचा पेच कायमच आहे. त्यामुळे पीक नुकसानाची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळा संपल्यानंतर महिनाभराचा कालवधी उलटून गेला; मात्र अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याने, जिल्ह्यासह राज्यभरात काढणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाच्या तडाख्यात सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. तसेच भात, भाजीपाला आणि फळपिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक नुकसानाच्या पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईची मदत मात्र अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही.
विधानसभा निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. 19 दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी; नवे सरकार स्थापन करण्याचा गुंता सुटला नाही. सरकार स्थापनेसाठी मुंबईत राजकारण्यांची लगबग सुरूच असल्याने, अवकाळी पावसाच्या तडाख्यात पीक नुकसानामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय अद्याप होऊ शकला नाही. त्यानुषंगाने नवे सरकार केव्हा सत्तारूढ होणार आणि शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिकांचे उत्पादन बुडाले; पण मदत किती मिळणार?
महिनाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. सर्वच पिकांचे उत्पादन पाण्यात बुडाले असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे येत्या रब्बी हंगामात पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा पेच शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. “अवकाळी’च्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाले असले तरी, पीक नुकसान भरपाईची मदत अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी हेक्टरी किती मदत मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.